महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : " कोल्हापूर औद्योगिक वसाहतीमधील वीज दर कमी दर करावा यासाठी कारखानदार उद्योजक व्यावसायिक गेली अनेक वर्ष सरकार दरबारी पाठपुरावा करत आहेत. शेजारील कर्नाटक आणि गुजरात राज्यांमध्ये औद्योगिक वीजदर कमी आहे मग महाराष्ट्रातच औद्योगिक वीजदर जादा का ? असा प्रश्न कोल्हापूरला सातारा जिल्ह्यातील औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासमोर उपस्थित केला.
उद्योगधंदे व व्यवसायिकांना भेडसावणाऱ्या अडचणींंची सोडवणूक करण्यासंबंधी उद्योगमंत्री सामंत यांची शनिवारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी व कोल्हापूर-सातारा जिल्ह्यातील औद्योगिक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांच्यासोबत बैठक झाली. हॉटेल सयाजी येथे झालेल्या बैठकीत इंडस्ट्रीज क्षेत्रातील वेगवेगळ्या समस्यावर चर्चा झाली. यावेळी कारखानदारांनी औद्योगिक वीजदर, औद्योगिक वसाहतीमधील घरफाळा, ट्रक टर्मिनस, रस्त्यांची सुविधा अशा वेगवेगळ्या विषयाकडे लक्ष वेधले. उद्योग मंत्री सामंत त्यांनी कारखानदारांच्या सगळ्या अडचणी विचारात घेऊन सोडवणूक केली जाईल अशी ग्वाही दिली. गोकुळ शिरगाव एमआयडीसी, शिरोली एमआयडीसी, उद्यमनगर वसाहत, हलकर्णी एमआयडीसीतील अडचणी, नवीन एमआयडीसी भूसंपादन अशा वेगवेगळ्या विषयांचा ऊहापोह झाला
औद्योगिक वीजदर कमी करण्यासंबंधी व महापालिका हद्दीतील औद्योगिक वसाहतीमध्ये घरफाळा कमी करण्यासंबंधी स्वतंत्र बैठका घेऊ. वीजदर कमी करण्यासंबंधी उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन दिलासादायक निर्णय घेऊ"अशी ग्वाही सामंत यांनी दिली. विकासवाडी येथे औद्योगिक वसाहतीसाठी 70 हेक्टर जागा ताब्यात घेऊन असेही त्यांनी सांगितले. या 70 एकर जागेपैकी 20 एक्टर जागा स्मॉल स्केल इंडस्ट्रीजसाठी असेल. तसेच एमआयडीसीमध्ये पोलीस स्टेशनची इमारती उभ्या करू. औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून उद्योगधंद्यांच्या सुरक्षिततेला ही प्राधान्य राहील.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ललित गांधी, सत्यजित चंद्रकांत जाधव, बाळासाहेबांची शिवसेना चे जिल्हाध्यक्ष रवींद्र माने आदींचे उपस्थितीमध्ये ही बैठक झाली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स या इंडस्ट्रीजचे ललित गांधी आणि प्रास्ताविक करताना औद्योगिक क्षेत्रासमोरील विविध विषयांचा आढावा घेतला.यावेळी झालेल्या चर्चेत दीपक पाटील, दीपक चोरगे, हरिश्चंद्र धोत्रे, विलास देसाई ,राजेंद्र मोहिते, जितेंद्र जाधव, सुरेंद्र जैन, प्रकाश मालाडकर, संगीता नलावडे, सचिन शिरगावकर, हर्षद दलाल यांच्यासह कारखानदाराने सहभाग घेतला. प्रादेशिक अधिकारी राहुल भिंगारे व अध्यक्ष अभियंता राजेंद्र गावडे यांनी मंत्री सामंत यांचे स्वागत केले.