महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
कोल्हापूर : "गेल्या दहा वर्षांमध्ये दिल्लीतील मोदी सरकारने देशाची वाईट दशा करून ठेवली आहे. ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा दिली त्या राज्याला खिळखिळे केले जात आहे. भारतीय जनता पक्षाला वन नेशन -वन पार्टी राबवायचे आहे. यामुळे ते विरोधी पक्षाला संपवत आहेत. आत्ताच्या निवडणुकीत भाजपला पराभूत केले नाही तर २०२४ ची निवडणूक अखेरची ठरेल. म्हणून राष्ट्र वाचविण्यासाठी महाराष्ट्राला उभा राहावे लागेल.तेंव्हा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा."अशी हाक शिवसेनेचे नेते नितीन बानगुडे पाटील यांनी कोल्हापूरकरांना दिली.कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारासाठी नितीन बानगुडे पाटील यांच्या शुक्रवारी कोल्हापुरात ठिकठिकाणी सभा झाल्या. राजारामपुरी, जुना बुधवार पेठ येथे झालेल्या सभेला नागरिकांची मोठी गर्दी होती. राजारामपुरी येथील मारुती मंदिराजवळ झालेल्या सभेत बोलताना नितीन बानुगडे पाटील म्हणाले, "यंदाची निवडणूक म्हणजे स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे. भाजपच्या राजवटीत संविधान, लोकशाही धोक्यात आहे. लोकशाही वाचली पाहिजे आणि संविधान टिकले पाहिजे म्हणून शाहू छत्रपती हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा."
गेल्या दहा वर्षातील भाजप सरकारच्या कारभाराचा पंचनामा करताना बानगुडे पाटील म्हणाले, "२०१४ मध्ये सत्तेवर येण्यापूर्वी भाजपाने परदेशातील काळा पैसा भारतात आणणार, सर्वसामान्यांच्या खात्यावर १५ लाख रुपये जमा करणार. वर्षाला दोन कोटी रोजगार निर्माण करणार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणार अशा नानाविध घोषणा केल्या होत्या. मात्र दहा वर्षात भाजपा सरकारने एकही आश्वासन पाळले नाही. उलट शेतकऱ्यांची लूट केली. शेती उत्पादनावर १८ टक्के जीएसटी लावली. जीएसटीच्या माध्यमातून एक लाखाच्या खरेदीवर १८ हजार रुपये शेतकऱ्यांच्याकडून ओरबडायचे आणि किसान सन्मान निधी म्हणून सहा हजार रुपये जमा करायचे हा कुठला प्रकार ? सध्या देशातील ४६ कोटी लोकसंख्या ही १८ वर्षाच्या आतील आहे. या मुलांच्या भवितव्याशी हे सरकार खेळत आहे. त्यांना योग्य शिक्षण नाही, रोजगार नाही हाताला काम नाही कष्टाला दाम नाही अशी स्थिती आहे.
ते म्हणाले, शंभर वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला. मागासवर्गीयांना ५० टक्के आरक्षण दिले. आता मोदींची गॅरेंटी सांगणाऱ्या भाजपा सरकारने २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करायचा निर्णय घेतला आहे. ६२००० शाळांच्या खाजगीकरणाचा डाव आहे. १४५७३ शाळा समूहशाळेच्या नावाखाली बंद करण्यात येत आहे. मग सर्वसामान्य मुलांनी शिकायचे कुठे ? मोदींच्या गॅरेंटेची कसलीही वॉरंटी नाही." अशा शब्दात नितीन बानुगडे पाटील यांनी हल्लाबोल केला.
शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कालावधीतील शासन म्हणजे महाराष्ट्राचा सुवर्णकाळ होता. कोरोना सारख्या महाभयंकर आपत्तीत उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राला सुरक्षित ठेवले. ८० हजार कोटीची गुंतवणूक राज्यात झाली. विना अट शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला.मात्र भाजपा सरकारने कुटिल पद्धतीने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून बाजूला केले. भाजपाने गद्दारांना हाताशी धरून महाराष्ट्रात सत्ताबदल केला, पण उद्धव ठाकरे यांना जनतेच्या मनातून कसे उतरवणार ? असा सवाल पाटील यांनी केला. भाजपाने राज्यांमध्ये जे फोडाफोडीचे राजकारण केले त्याविषयी लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. ही निवडणूक म्हणजे गद्दारी विरुद्ध निष्ठावंत व भाजप विरुद्ध भारतीय जनता अशी आहे. आणि ही लढाई नक्कीच देशभरातील जनता जिंकणार आहे. इंडिया आघाडी, महाविकास आघाडीचे उमेदवारांना विजयी करतील."असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आमदार जयश्री जाधव म्हणाले,"भाजप सरकारच्या राजवटीत नागरिकांना जगणे मुश्किल झाले आहे. महागाईमुळे महिला त्रस्त आहेत. हिंदुत्वाच्या नावाखाली भाजप फोडाफोडीचे राजकारण करत आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये दिल्ली दरबारी शाहू छत्रपती यांच्यासारख्या सक्षम लोकप्रतिनिधी हवा. तेव्हा हात त्या चिन्हावर बटन दाबून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या." शिवसेना उपनेते संजय पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांना सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळत आहे. कोल्हापुरातील जनता शाहू छत्रपतींच्या पाठीशी आहे. ते नक्कीच विजय होतील. असे सांगितले. याप्रसंगी कॉम्रेड दिलीप पवार, माजी नगरसेवक अनिल कदम शेकापचे बाबुराव कदम, माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांची भाषणे झाली. बहुतांश नेत्यांनी महायुतीचे खासदार संजय मंडलिक व त्यांचे चिरंजीव वीरेंद्र मंडलिक यांचा चांगलाच समाचार घेतला. सभेला काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष रविकिरण इंगवले माजी नगरसेवक संजय मोहिते, काकासाहेब पाटील, शिवाजी कवाळे, काँग्रेसच्या कार्यकर्त्या सरला पाटील, संध्या घोटणे, शेखर घोटणे, रघुनाथ टिपुगडे, महेश उत्तुरे, उमेश पोवार, विशाल देवकुळे, मनजित माने, कमलाकर जगदाळे, बाबा इंदुलकर, अनिल घाटगे, अनुप पाटील, अमित कदम, दुर्गेश लिंगरस, काका जाधव, बापू जाधव आदी उपस्थित होते.