महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विश्वगुरु अशी टिमकी वाजवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत जनहिताला प्राधान्य देऊन केलेली नऊ विकास कामे सांगावीत. भाजपाकडे विकासाच्या मुद्यावर बोलायला काहीच नाही. म्हणून ते जातीधर्माच्या नावावर राजकारण करत आहेत असा निशाणा शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी साधला.
‘लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यभर पोषक वातावरण आहे. राज्यात तीसहून अधिक जागा महाविकास आघाडीला मिळतील. ही निवडणूक जनतेने हाती घेतली आहे.’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारासाठी अंधारे या गुरुवारी (२५ एप्रिल ) कोल्हापूर दौऱ्यावर होत्या. यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेवेळी अनेक ठिकाणी मतदानाची टक्केवारी कमी दिसते यावरुन सरकारी यंत्रणा व भाजपा सरकारने चिंता करण्याऐवजी चिंतन करावे असा टोलाही त्यांना लगावला.
अंधारे म्हणाले, ‘सरकारी यंत्रणांना हाताशी धरुन भाजप सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही या पद्धतीने प्रचार करत असतानाही निवडणूक आयोगाकडून नोटीसा लागू होत आहेत. राजकीय हेतून प्रेरित कारवाई होत आहेत. मला माझ्या पक्षाची भूमिका मांडण्यापासून परावृत्त करण्याचा हा प्रकार आहे. दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील नेते मंडळीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते. ठाणे येथे सत्ताधारी पक्षाच्या महिला पदाधिकारी पैसे वाटप करत असल्याचे पुरावे निवडणूक आयोगाला दिले तरी त्यांच्याकडून कारवाई होत नाही.’
‘मोदी सरकारकडे विकासात्मक गोष्टी नाहीत. महागाई, रोजगार, महिलांची सुरक्षितता अशा विविध विषयावर सरकार अपयशी ठरले. महिलांच्या सुरक्षिततेसंबंधी श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. मात्र ते गोड गोड बोलण्यापलीकडे श्वेतपत्रिका काढण्यासंबंधी काहीच कार्यवाही करत नाहीत.’असेही अंधारे म्हणाल्या. पत्रकार परिषदेला शिवसेनेचे उपनेते संजय पवार, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, महिला संघटक स्मिता सावंत, माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, विशाल देवकुळे, मनजित माने आदी उपस्थित होते.