महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ निवडणूक देश कुणाच्या हातात द्यायचा यासाठी आहे. निवडणूक लोकसभेसाठीची नाही तर; देशाच्या विकासाची निवडणूक आहे. महायुतीत एकजूट ठेवा. "मान गादीला पण मत मोदींना द्या", असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
करवीर तालुक्यातील वाकरे फाटा येथील विठाई - चंद्राई हॉलमध्ये करवीर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याचे आयोजन माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केले.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ‘निवडणूक सोपी असली तरी गांभीर्याने उतरावे लागेल. देशातील नागरिकांनी श्री. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे ठरवलय. मोदींच्या काळात नया पैशाचा घोटाळा नाही. राम मंदिर, चांद्रयान २, व्हॅक्सीन, जुन्या मंदिरांचा निर्णोध्दार, विमानतळ, रेल्वे स्टेशन अशी अनेक कामे कोट्यावधी रुपये खर्चून मार्गी लावली. हा पहिला नेता ज्याने विकसित भारताचे स्वप्न पाहिलं.
माजी आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, २०१४ पासून विकासाचा रथ झपाट्याने चालला. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये पाचव्या क्रमांकावर पोहोचलेला आपला देश तिसऱ्या क्रमांकाची महासत्ता बनवण्यासाठी मोदींना पंतप्रधान करणे गरजेचे आहे. मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे.
उमेदवार खासदार मंडलिक म्हणाले, वाड्यावर जन्माला आला तरी एकाच मताचा अधिकार आणि झोपडीत जन्माला आला तरी मताचा अधिकार एकच. दहा वर्षात देशाची प्रगती झाली. कोट्यावधी रुपयांचा निधी या मतदारसंघात खर्च केला. मान गादीला पण मत मोदींना द्या.
राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, केडीसीसी बँकेचे माजी संचालक पी.जी. शिंदे, भाजप करवीर विधानसभा अध्यक्ष हंबीरराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी के. एस. चौगले, एस. आर. पाटील, डॉ.के.एन. पाटील, डॉ. आनंद गुरव, नवनाथ पोवार, देवराज नरके, राजवीर नरके उपस्थित होते. गोकुळचे संचालक अजित नरके यांनी प्रास्ताविक केले.
........
नौका पार करतोय.....!
माजी आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, "आमचं ठरलंय....," "आपलं ठरलय....," हे मी ऐकतच आलोय. पण माझ्या बाबतीत असं काय घडतंय ? लोकांचं ठरतय, आणि त्यांचा आशिर्वाद मिळाला की मी नौका पार करतोय. एकट्यानं लढायचं हेच शिकलोय.
.........................
मुश्रीफ म्हणाले, स्व. सदाशिव मंडलिक यांनी गैबी बोगदा तयार करून भोगावती नदीत नऊ टीएमसी पाणी सोडलं. हे करत असताना त्यांना कागलमधील विरोधकांचा रोष पत्करावा लागला. त्यावेळी त्यांना ' कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ ' अशी उपमा देण्यात आली. परंतु; कै. मंडलिक यांनी कोल्हापूर व करवीरचा विचार करून बोगदा काम पूर्णत्वास नेले. यासाठी त्यांनी कागलमधील काही विरोधकांचा रोष पत्करला. कोल्हापूर व करवीरसाठी त्यांनी नऊ टीएमसी पाण्याची केलेली सोय जनता कधीच विसरणार नाही.