महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा म्हणून जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद प्रयत्नशील आहे. याकरिता मतदार जागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेने आता ग्रामपंचायत क्षेत्रातील ज्या मतदान केंद्रावर ६० टक्केपेक्षा अधिक मतदान होईल त्या बूथ लेवल अवेरनेस ग्रुपना बक्षीस स्वरुपात गौरविण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी माहिती दिली. जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागामार्फत माझे मत, माझे भविष्य आणि एका मताचे सामर्थ्य या सुत्रानुसार हे अभियान होणार आहे.
यामध्ये ८५ टक्केपेक्षा अधिक मतदान झाल्यास जिल्हास्तरावर गोल्ड मेडल देऊन गौरविण्यात येईल. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या हस्ते हा गौरव समारंभ होईल. ८१ ते ८५ टक्के दरम्यान मतदान नोंदविल्यास सिल्व्हर मेडल तर ७० ते ८० टक्के मतदान झाल्यास ब्राँझ मेडल देऊन गौरव होणार आहे. हे दोन्ही सत्कार तालुकास्तरावर होतील. उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकाास अधिकारी, पोलिस निरीक्षक यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा होईल. दरम्यान ग्रामपंचायत पातळीवर मतदार जनजागृतीसंबंधी विविध कार्यक्रम राबविण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत.
२०१९ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात ७०.८८ टक्के मतदान झाले होते. तर राज्यात ६१.०२ टक्के मतदानाची नोंद झाली होती. २०१९ मधील निवडणुकीत ६० टक्केपेक्षा कमी मतदान झालेल्या केंद्राची जिल्ह्यातील संख्या २५० इतकी आहे. यामध्ये शाहूवाडी तालुक्यात ८५ तर चंदगड तालुक्यातील ८४ मतदान केंद्रावर साठ टक्केपेक्षा कमी मतदान झाले होते. त्या पाठोपाठ राधानगरीत ३९, कागलमध्ये पंधरा, कोल्हापूर दक्षिणमध्ये पाच, करवीरमध्ये अठरा आणि इचलकरंजी व शिरोळमध्ये प्रत्येकी दोन मतदान केंद्रावर साठ टक्केपेक्षा कमी मतदान होते.
२०२४ मधील निवडणुकीत अधिकाधिक लोकांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. ग्रामपंचायत स्तरावर बूथ लेवल अवेरनेस ग्रुप तयार करावा. ग्रामपंचायत, पंचायत समिती संकेतस्थळावर व सोशल मिडियावर मतदारांना आवाहन करणारा संदेश प्रसारित करावा. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात मोक्याच्या ठिकाणी होर्डिंग्ज, बॅनर्स लावावेत. मतदार जागृतीसाठी आठवडी बाजार, यात्रा व गर्दीच्या ठिकाणी पथनाटये सादर करावीत. खेळाडू, कलावंत, सामाजिक कार्यकर्ते, दिव्यांग व्यकती, ज्येष्ठ नागरिकांमार्फत मतदारांमध्ये जागृती करावी. महाविद्यालयात मतदार जागृती कार्यक्रम करावेत. असेही जिल्हा परिषद प्रशासनाने कळविले आहे.