महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अनेक वेळा जिल्हाधिकार्यांना भेटून, सोपा व कमी खर्चाचा पर्याय देवूनही जर प्रशासन प्रस्तावित मंदिर परिसर विकास आराखड्याने बाधित होणार्या व्यापारी आणि रहिवाशांच्या, त्याच परिसरात पुनर्वसन करण्याच्या मागणीचा विचारही करत नसेल तर आमचे अस्तित्व संपविणार्या आणि कोल्हापूरची मूळ बाजारपेठ उध्वस्त करणार्या या आराखड्यास तीव्र विरोध करू असा इशारा महाद्वार व्यापारी असोसिएशनने पत्रकाद्वारे दिला आहे.
जिल्हा समितीने सुमारे १४४७ कोटी रुपयांच्या मंदिराच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. या पार्श्वभूमीवर महाद्वार व्यापारी असोसिएशनचे किरण नकाते, जयंत गोयाणी, मनोज बहिरशेठ, विक्रम जरग, अजित ठाणेकर यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे, ‘मंदिर परिसरातील रहिवाशी व व्यावसायिकांच्या पुनर्वसनाबाबत काहीही अंतर्भूत केलेले नाही. बाहेरून येणार्या भाविकांसाठी मंदिर परिसराचा विकास करताना जर मंदिरावर व्यवसाय अवलंबून असलेले व्यावसायिक आणि पिढ्यानपिढ्या मंदिराशी ऋणानुबंध असलेले रहिवाशांचे इथले अस्तित्व संपून त्यांचे भवितव्य भकास होणार असेल तर अशा विकासास महाद्वार व्यापारी असोसिएशनचा तीव्र विरोध राहील. यासाठी रस्त्यावर तसेच न्यायालयात संघर्ष करावयास आम्ही मागे पुढे पाहणार नाही असेही पत्रकात म्हटले आहे.