महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त एक ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला मुलींना जंतनाशक गोळी देवून विशेष मोहीम राबविली जाते. या अनुषंगाने जिल्हास्तरावरील मोहिमेत सहभागी आरोग्य विभागाच्या यंत्रणेच्या आढावा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांपर्यंत वेळेत जंतनाशक गोळ्या पोहचवा, असे आदेश दिले.
प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, मुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बाल विकास शिल्पा पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, शिक्षणाधिकारी प्राथमिक मीना शेंडकर यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शाळेत जाणाऱ्या सर्व बालकांसाठी व किशोरवयीन मुला मुलींसाठी, शासकीय अनुदानित व विना अनुदानित सर्व शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये व अंगणवाडी केंद्रांमध्ये तेरा फेब्रुवारी रोजी शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना (सहा ते १९ वर्षे वयोगट) जंतनाशक गोळ्या देतील. या काळात आजारी व अन्य औषधे घेणाऱ्या बालकांना जंतनाशक गोळ्या दिल्या जाणार नाहीत. ते बरे झाल्यानंतरच गोळ्या दिल्या जाणार आहेत. याबाबतची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गायकवाड यांनी दिली.
जंतनाशकाचे फायदे- रक्तक्षय कमी होतो व आरोग्य सुधारते, बालकांची वाढ भराभर होते व ती निरोगी बनतात, अन्य संसर्गांचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढते, शाळेतील उपस्थिती वाढण्यास मदत होते, बालकाची आकलनशक्ती सुधारते व ते शाळेत अधिक क्रियाशील बनतात, मोठेपणी काम करण्याची व दीर्घकाळ अर्थार्जन करण्याची क्षमता वाढते.