महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी प्रचंड शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. बैलगाडीतून येऊन त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. कार्यकर्त्यांनी ‘एकच गट्टी, राजू शेट्टी’अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी दसरा चौक येथे सभा झाली.
या सभेत बोलताना राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले. साखर कारखानदारांनी सर्वांनी एकत्र येऊन माझ्याविरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार उभा केला आहे. राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांचे कटकारस्थान व आमदार सतेज पाटील यांच्या मायावी बोलण्याला जनता फसणार नाही. तसेच हातकणंगलेतील गद्दाराला चितपट करू. ’असा विश्वासही शेट्टी यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी रडीचा डाव खेळू नये असेही ते म्हणाले.
याप्रसंगी प्रा. जालिंदर पाटील, एसएमपी गॅरंटी किसान मोर्चाचे राष्ट्रीय समन्वयक व्ही. एम. सिंग, सावकर मादनाईक, वैभव कांबळे, सतीश काकडे यांनी मनोगत व्यक्त केले. शेट्टी यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यावेळी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील नागरिक व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. शेट्टी ायांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना कष्टकऱ्यांना सोबत नेले होते.