महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘‘ राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारगच्या निमित्तानं, गेले चार दिवस दिल्ली मधील केंद्र सरकारचा उत्तम आदरयुक्त पाहुणचार व निरोपाचा समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झाला. पन्नासपैकी चार शिक्षकांना त्यांच्याशी सुसंवाद साधण्यासाठी निवडलं होतं त्या चौघांपैकी मी एक होतो. पंतप्रधानांनी इतक्या कौटुंबिक पद्धतीने व आपुलकीने संवाद साधला की पंतप्रधानांच्या सोबत आपण आहोत हेच विसरून गेलो .. आदरयुक्त संबोधन ,वयक्तिक माहिती, कार्याचे कौतुक , योग्य सल्ला यातून उमलत गेलेला बारा मिनिटांचा माझा संवाद ही आयुष्यातील एक सुंदर उपलब्धी आहे. मी ते क्षण जगलोय भरभरून…सध्या तरी मी हवेत तरंगतोय.. आयुष्य कृतार्थ झालं. धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !’ हे बोल आहेत, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते कलाशिक्षक सागर बगाडे यांचे.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने देशभरातील विविध भागातील विविध शिक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी, सहा सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांनी शिक्षकांशी संवाद साधला. मोदी यांनी कलाशिक्षक बगाडे यांच्याशी बारा मिनिटे संवाद साधला. या भेटीविषयी बगाडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. बगाडे म्हणाले, ‘पंतप्रधान मोदी हे प्रचंड अभ्यासू आणि हजरजबाबी आहेत. माझ्यातील कलाशिक्षक आणि पारंपरिक लोकनृत्यविषयक कामाची त्यांनी प्रशंसा केली.
या भेटीत मोदी यांनी बगाडे यांना रिटायर्ड होने के बाद क्या प्लॅन है अशी विचारणा केली. बगाडे यांनी, ‘धनगरवाडयावरील मुलांसाठी काम करायचे आहे. लोकनृत्यांचे जतन करुन ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवायची आहे.’यावर पंतप्रधान मोदी यांनी बगाडे यांचे कौतुक केले आणि ‘तुम्हे फिरे बुलायेंगे तो आना पडेगा’असे म्हणाले. पंतप्रधानांची भेट, झालेला संवाद हा सारा प्रसंग माझ्यासाठी वेगळी अनुभूती असल्याचे कलाशिक्षक बगाडे यांनी नमूद केले.