महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : लोकसभा निवडणूक लढवायची म्हणून गेली दोन वर्ष पायाला भिंगरी बांधून जिल्हा दौरा करणाऱ्या गोकुळचे संचालक चेतन अरुण नरके यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. नरके हे महाविकास आघाडीकडून तिकीट मिळावे यासाठी प्रयत्नशील होते. त्याने महाविकास आघाडीच्या नेते मंडळींच्या भेटी घेतल्या होत्या. मात्र उमेदवारीची लॉटरी काही त्यांना लागली नाही. दरम्यान बुधवारी, १७ एप्रिल रोजी नरके यांनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले.
नरके म्हणाले, 'काही अपरिहार्य ,राजकीय आणि सामाजिक कारणामुळे लोकसभा निवडणुकीतून माघार घेत आहे. मात्र, निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला अथवा उमेदवाराला पाठींबा देणार नाही. युवकांना स्वयंरोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध करुन देण्यासाठी चेतन युवा सेतू संस्थेची स्थापना करणार आहे. तसेच थायलंडसह अशिया खंडातील अनेक देशांसोबत साम्यंजस्य कराराच्या माध्यमातून कोल्हापुरातील फौंड्रीसह उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील राहणार. कोल्हापुरातील राजकीय, सामाजिक, कला, क्रिडा क्षेत्रात यापुढेही तितक्याच जोमाने कार्यरत राहणार असल्याचेही डॉ. नरके यांनी स्पष्ट केले.
डॉ. नरके म्हणाले, शिक्षण, नोकरी आणि उद्योगाच्या निमित्ताने मी १९ वर्षे अमेरिका, आशिया आणि युरोपीय देशात रहिलो. येथील प्रगत शहरांची कोल्हापूरसोबत तूलना करता, येथे मोठ्या प्रमाणात संधी असल्याचे ठळकपणे जाणवले. मात्र, राजकीय उदासिनता, प्रबोधन आणि अभ्यासाची कमतरता, योग्य मार्गदर्शन आणि पाठपुरावा नसल्यानेच कोल्हापुरात औद्योगिक, पर्यावरणीय, रोजगार आणि सामाजिक समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. या समस्यातून कोल्हापूरची सुटका करणे हे प्रश्न सोडवणे शक्य असल्याचे मी अभ्यासपूर्वक जाणून घेतले. यासाठी कोल्हापूर लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली. गेली अडीच वर्षे ११५० गावं आणि वाड्यावस्त्यांचा दौरा केला. या दरम्यान ग्रामीण व शहरातील समस्या आणि जनभावना जाणून घेतल्या. कोल्हापूरची जनता हाच तुमचा पक्ष म्हणून रिंगणात उतरा, असा आग्रह कोल्हापूरकरांचा होता. पण, अपक्ष रिंगणात राहून या सगळ्या गोष्टी साध्य करणे शक्य नव्हते. भविष्यात चार पावलांची झेप घेण्यासाठी दोन पाऊले मागे घेण्याची तयारीही आपली हवी. म्हणून या रिंगणातून माघार घेत असलो तरी कोल्हापूरच्या विकासाच्या ध्येयापासून बाजूला होणार नाही. माझ्या परीने कोल्हापूर व येथील जनतेच्या उन्नतीसाठी यापुढेही प्रयत्नशील राहणार आहे.
कोल्हापूरच्या जनतेने गेल्या अडीच वर्षात दिलेले पाठबळ मी कधीही विसरु शकत नाही.माझ्या या राजकीय भूमिकेने माझ्यावर प्रेम करणाऱ्यांच्या कदाचित भावना दुखावल्या असतील, त्यांची माफी मागून असेच ऋणानुबंध कायम ठेवण्याचा माझा नेहमी प्रयत्न राहणार असून यापुढे सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करत राहीन.
..............
"विझलो जरी मी आज, हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही..येतील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालतो..अडथळ्यांना भिवून अडखळणे, पावलांना पसंत नाही...रोखण्यास वाट माझी, वादळे होती आतूर...डोळ्यात जरी गेली धूळ, थांबण्यास उसंत नाही.. कवीवर्य सुरेश भट्ट यांच्या काव्यपक्तींने डॉ. नरके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या काव्यपंक्तीतून डॉ. नरके यांनी मागील दोन वर्षात त्यांच्याबाबतीत घडलेल्या राजकीय घटनांचा परामर्ष घेत भविष्यातील राजकीय वाटचालीकडेही अंगुलीनिर्देष केले.
..............