महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
लोकनेते स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी संपूर्ण आयुष्य गोरगरीब जनतेसाठी खर्ची घातले. त्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. आपण त्यांचे देणे लागतो, ही भावना मनी ठेवा. प्रा. संजय मंडलिक यांना विजयी करून त्यांचा पांग फेडण्याची हीच योग्य वेळ आहे, असे भावनिक उद्गार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले.
कागल तालुक्यातील बाचणी येथे महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित केली होती. या सभेत बोलताना मुश्रीफ म्हणाले, ‘१९७२ पासून सदाशिवराव मंडलीक यांनी गोरगरिबांच्या कल्याणाचा ध्यास घेतला. संपूर्ण हयात ते जनतेच्या कल्याणासाठीच अविरत झटले. कै मंडलिक यांच्या श्रद्धांजलीपोटी येणारे केवळ सात दिवस द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
कागल तालुक्यातून वाहणाऱ्या वेदगंगा व दूधगंगा या दोन्हीही नद्या बारमाही वाहत आहेत. ही स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांचीच देण आहे. त्यांच्या पुण्याईमुळेच ही हरितक्रांती झाली आहे.’खासदार प्रा. संजय मंडलिक म्हणाले, विरोधी उमेदवारांना लोकशाही मार्गाने आम्ही अनेक प्रश्न केले आहेत. परंतु; राजापेक्षा प्रधानच जास्त बोलायला लागलेत. त्यांनी फार चोंबडेपणा करू नये.” यावेळी माजी सरपंच सूर्यकांत पाटील, बाजार समितीचे माजी अध्यक्ष दिनकरराव कोतेकर यांची भाषणे झाली.
बिद्री कारखान्याचे संचालक सुनील सूर्यवंशी, दिनकर कोतेकर, बाळासाहेब तुरुंबे, नेताजी पाटील, नारायण पाटील, बाळासाहेब पाटील, दत्तात्रय पाटील, प्रकाश पाटील, इकबाल नायकवडी, भिकाजी पाटील, पांडुरंग पाटील, निवास पाटील, विशाल पाटील, डी. एस. पाटील, एकनाथ पाटील, नाना पाटील, तानाजी चौगुले, धनाजी बाचणकर, संजय पाटील, विलास पाटील, अशोक ढवण आदी प्रमुख उपस्थित होते.माजी सरपंच निवास पाटील यांनी स्वागत केले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोज फराकटे यांनी प्रास्ताविक केले.
...................................
वारस इस्टेटचे आणि विचारांचे........
*कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा शितल फराकटे म्हणाल्या, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे विचार स्वर्ग सदाशिवराव मंडलिक यांनी आम्हा सर्व जनतेमध्ये रुजवले आहेत. त्यामुळे ही लढाई राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या ईस्टीटीचे वारस आणि विचारांचे वारस यांच्यामध्ये होत आहे.