महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘प्रचाराच्या कालावधीत मतदारांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांशी थेट संवाद साधता आला. वाड्यावस्तीवरील नागरिकांपर्यंत संपर्क झाला. या कालावधीत नागरिकांचे जे प्रेम, प्रतिसाद लाभला ते पाहता आपला विजय निश्चित आहे.”अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांनी दिली आहे.
शाहू छत्रपती यांनी मतदानादिवशी दिवसभर विविध मतदारसंघांचा दौरा केला. सकाळी सात वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर छत्रपती कुटुंबांने मतदान केले. यानंतर शाहू छत्रपती यांनी कोल्हापूर उत्तर, दक्षिण, कागल, गडहिंग्लज, राधानगरी- भुदरगड, करवीर मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या. सायंकाळी मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, ‘नागरिकांनी ज्या उत्साहाने मतदान केले ते पाहता त्यांना परिवर्तन घडवायचे आहे हे सिद्ध झाले. मी रयतेचा उमेदवार होतो. रयतेनेच माझी उमेदवारी घरोघरी पोहोचवली. आपली वाटचाल विकासाभिमुख राहिल. माझ्या प्रचारासाठी गेले महिना-दीड महिने ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले, दिवसरात्र प्रचार केला त्या साऱ्यांचा मी मनापासून आभारी आहे. महाविकास आघाडीत सहभागी पक्षाचे व मला पाठिंबा देणाऱ्या विविध पक्ष, संस्था-संघटनेचे नेते मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जे परिश्रम घेतले त्यांचे मी मनापासून आभार मानतो. ’