सात लाखाहून अधिक शेतकरी-हजारो उद्योजकांची यशोगाथा गोकुळमुळे घडली
schedule15 Sep 22 person by visibility 864 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : “सात लाखाहून अधिक शेतकरी आणि हजारो उद्योजकांची यशोगाथा गोकुळमुळे निर्माण झाली आहे. ज्या देशाचे कृषी क्षेत्र मजबूत त्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत असते.” असे प्रतिपादन डॉ. चेतन नरके यांनी नवी दिल्ली येथे केले.
आंतरराष्ट्रीय डेयरी महासंघातर्फे नवी दिल्ली येथे आयोजित जागतिक डेअरी शिखर संमेलनातील तांत्रिक परिषदेत “डेयरी उद्योगातून निर्माण झालेले ग्रामीण भागातील पर्यावरणपूरक आणि शाश्वत अर्थचक्र” या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर, केंद्रीय पशुसंवर्धन विभागाच्या सचिव वर्षा जोशी, एन.डी.डी.बी.चे टीम लीडर नरेंद्र कराडे, रिजर्व बँकेच्या केंद्रीय मंडळाचे संचालक सतीश मराठे, मारुती सुझुकी चे संचालक केंचुरो टोयोफुको, नेदरलँड मधील जागतिक अभ्यासक अलार्ड एस्लिंक उपस्थित होते.
नरके म्हणाले, ‘भारतातील दुग्धव्यवसाय आणि इथल्या कृषी संस्कृतीमुळेच ग्रामीण अर्थव्यवस्था शाश्वत बनली आहे. पण दुग्धव्यवसाय अधिक फायदेशीर बनवण्यासाठी आणि जागतिक स्पर्धेला तोंड देण्यासाठी त्यामध्ये आधुनिक साधनांचा वापर करण्याची गरज आहे.डेअरी उद्योगातील प्रत्येक घटक हा अर्थव्यवस्थेला हातभार लावतो.
अगदी नैसर्गिक अथवा कृत्रिम रेतन, वासरू संगोपन, आरोग्य सेवा, पशु खाद्य, वैरण निर्मिती, गोठा व्यवस्थापन, दूध आणि दुधापासून निर्माण होणारे असंख्य उपपदार्थ अगदी गोमूत्र आणि शेण सुद्धा आर्थिक स्त्रोत निर्माण करतात. भारतात सुरवातीपासूनच शेण आणि मूत्राचा वापर हा शेतीसाठी होत असल्याने समस्येचे रुपांतर संधीत झाले आहे. ग्रीन डेअरी हि संकल्पना भारतात सुरवातीपासून अस्तित्वात आहे.या क्षेत्राचे संघटीत स्वरूप जिल्ह्याच्या एकात्मिक विकासाला हातभार लावून ग्रामीण अर्थव्यवस्थेत एक नवा मानदंड निर्माण करू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाकडे पाहता येईल.’