महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत कामगार संघाच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सोमवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे गाव पातळीवरील ग्रामपंचायतचे कार्यालयीन कामकाज ठप्प राहिले. कामगार संघाच्या शिष्टमंडळाने, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
यावलकर समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपरिषद कर्मचाऱ्याप्रमाणे वेतनश्रेणीसहित अन्य वेतन विषयक लाभ मिळावेत वाढीव किमान वेतन मार्च 2018 पासून लागू करा आणि वाढीव फरक बिलाची थकबाकी तत्काळ जमा करावी. लोकसंख्येच्या जाचक आकृतीबंधाची अट रद्द करावी. प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेच्या आत मासिक वेतन द्या यासह दहा मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी आंदोलन पुकारले होते. जनरल सेक्रेटरी बबन पाटील जिल्हाध्यक्ष सम्राट मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. दरम्यान आंदोलनास्थळी भेट देऊन कॉमेड दिलीप पवार, सतीश कांबळे, शिवाजीराव परुळेकर, रघुनाथ कांबळे यांनी पाठिंबा दिला. आंदोलनात कामगार संघाचे उपाध्यक्ष रवी कांबळे, भिकाजी देसाई, विशाल कांबळे, दीपक कांबळे, अशोक गेंगे, परशुराम कांबळे आदींचा सहभाग होता.