महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : छत्रपती ताराराणी चौकातील विश्रामगृहाचे जतन-संवर्धन करून, पर्यटन स्थळ म्हणून विकसित करावे अशी मागणी आमदार जयश्री जाधव यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.
ताराराणी चौकातील विश्रामगृहाची उभारणी छत्रपती राजाराम महाराजांनी १९३९ मध्ये केली आहे. संस्थान काळात या विश्रामगृहाला ट्रॅव्हलर्स बंगला म्हणून ओळखले जात होते. सुमारे एक एकर भूखंडावर असलेल्या या ऐतिहासिक विश्रामगृहाचा ऐतिहासिक वारसा स्थळाच्या क्रमांक दोनच्या यादीमध्ये समावेश असून, हेरिटेज प्रॉपर्टी म्हणून शासन दप्तरी नोंद आहे. संस्थान काळापासून कोल्हापूरच्या विकासाचे साक्षीदार असणारे या विश्रामगृहाच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. यामुळे विनावापर पडून आहेत.
अभियंते मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्यासह अनेक विद्वानांची निवासाची व्यवस्था या ऐतिहासिक विश्रामगृहात केली होती. यामुळे या ऐतिहासिक वास्तूचे जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे. परंतु या ऐतिहासिक वास्तूची मोक्याची जागा हडप करण्यासाठी काहीजण सक्रिय झाल्याचे समजते.
त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूचे जतन व संवर्धनसाठी सरकारने पुढाकार घेऊन निधीची तरतूद करावी.