जिल्ह्यातील ६१८ शाळा महिला शिक्षकाविना ! नजीकच्या शाळेतील शिक्षिकेवर किशोरी संवादची जबाबबारी !!
schedule01 Oct 25 person by visibility 73 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : किशोर वय म्हणजे बालपणातून तारुण्याकडे जाण्याचा महत्वाचा टप्पा. या काळात शारीरिक, मानसिक, भावनिक, आणि सामाजिक पातळीवर बदल होत असतात. या बदलांना योग्य दिशा मिळावी, त्यांच्या शिक्षणात येणाऱ्या अडचणी सुटाव्यात यासाठी किशोरी संवाद अभियान राबविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. दरम्यान जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालकीच्या ६१८ शाळांमध्ये महिला शिक्षक कार्यरत नाहीत. अशा शाळेतील मुलींशी संवाद साधण्याची जबाबदारी नजीकच्या शाळेतील शिक्षिकेंवर सोपविली आहे. नजीकच्या शाळेतील महिला शिक्षकांनी दर शनिवारी नेमून दिलेल्या शाळेत जाऊन मुलींशी संवाद साधायचा आहे.
किशोरी संवाद अभियान अंतर्गत मुलींच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन, किशोर वयामध्ये होणारे शारीरिक व मानसिक बदल, शैक्षणिक विकासात येणाऱ्या अडचणी यासंबंधी मार्गदर्शन होणार आहे. शाळास्तरावर तक्रारपेटी उघडणे, सखी सावित्री समितीची बैठक घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना आहेत. दरम्यान ज्या केंद्रामध्ये महिला शिक्षक नाहीत त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकेने किशोरी संवाद अंतर्गत कामकाज करण्याच्या सूचना आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात एकूण १९५८ शाळा आहेत. यापैकी महिला शिक्षक नसलेल्या शाळांची संख्या ६१८ इतकी आहे. यामध्ये आजरा तालुक्यातील ४८ शाळेत महिला शिक्षक नाहीत. महिला शिक्षक नसलेल्या शाळांची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. गगनबावडा तालुक्यात ३२, चंदगडमध्ये १०२ शाळा, भुदरगडमध्ये ६२, तर गडहिंग्लज तालुक्यात ३७ शाळेत शिक्षिका नाहीत. कागल आणि करवीर तालुक्यात प्रत्येकी तीस शाळेत महिला शिक्षक नाहीत. शाहूवाडीत ३१ शाळेत तर शिरोळमध्ये एका शाळेत महिला शिक्षक नाही. हातकणंगले तालुक्यातील २५, राधानगरी तालुक्यातील ९० तर पन्हाळा तालुक्यातील ६४ शाळेत महिला शिक्षक नाहीत.
………………………..
“ या अभियानमुळे सर्व शाळांमधील किशोरवयीन मुलींच्या शिक्षणाला चालना मिळेल.मुलींच्या अडीअडचणी सोडविण्यात मदत होईल. मुलींच्यामध्ये शाळांबद्दल, शिक्षणाबद्दल आस्था निर्माण होईल. शिक्षण अर्धवट राहण्याचे प्रमाण पूर्ण कमी होईल.”
- मीना शेंडकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर