महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महापालिकेतील शहर अभियंता हे महत्वाचे पद. या पदावर वर्णी लागण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ असते. कोल्हापूर महापालिकेच्या शहर अभियंतापदी पुन्हा नेत्रदीप सरनोबत यांची नियुक्ती करावी असे आदेशच नगरविकास विभागाने महापालिकेला दिल्या आहेत. शहरातील खराब रस्त्यावरुन २८ मार्च २०२३ रोजी सरनोबत यांच्याकडून शहर अभियंतापदाचा कार्यभार काढून घेण्यात आला होता. त्यांच्याकडे पाणी पुरवठा विभागाचे जल अभियंतापद सोपविण्यात आले होते.
दरम्यान ‘कोल्हापूर शहरातील विविध विकासकामे, विविध प्रकल्पांची कामे, सरकारच्या योजना व अमृत एक आणि दोन योजनेची यशस्वी अंमलबजावणी करुन प्रकल्प मार्गी लावणे आवश्यक आहे. यासाठी नेत्रदीप सरनोबत यांच्याकडे शहर अभियंतापदाचा व अमृत दोन या योजनेचा पूर्ण वेळ कार्यभार सोपविण्यात यावा. तसेच जल अभियंता पदाचा कार्यभार इतरांकडे सोपविण्याची कार्यवाही करावी.‘असे पत्र नगरविकास विभागाचे उपसचिव सुशिला पवार यांनी महापालिका आयुक्तांना पाठविले आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. शहरातील खराब रस्त्यावरुन ते वैतागले होते. त्यांनी, शहरातील खराब रस्त्यावरुन राज्याच्या प्रधान सचिवांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर नगरविकास विभागाकडून महापालिकेला सरनोबत यांना त्या पदावरुन हटविण्यासंबंधी सूचना दिल्या होत्या. वर्षभरातच सरनोबत यांची पुन्हा शहर अभियंतापदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर शहर अभियंता हर्षजित घाटगे यांच्याकडे पुन्हा एकदा पाणीपुरवठा विभागाच्या जल अभियंतापदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
………………
दोन्ही आदेश नगरविकासचेच, सुशिला पवार यांच्या सहीचे
गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवडयात सरनोबत यांच्याकडून शहर अभियंतापदाचा कार्यभार काढून घेण्यासंबंधी कार्यवाही करण्याचा आदेश नगरविकास विभागाच्या उपसचिव सुशिला पवार यांच्या सहीनेच निघाला होता. वर्षभरानंतर पुन्हा सरनोबत यांची शहर अभियंतापदी नियुक्ती करावी असा आदेशही पवार यांच्या सहीनेच निघाला आहे. गेल्या वर्षी खराब रस्त्यावरुन पदावरुन बाजूला केले होते. तर आता योजनांची यशस्वी अंमलबजावणीसाठी नियुक्ती करण्यासंबंधी कार्यवाही करावी असे कळविले आहे. गेल्या वर्षभराचा कालावधी वगळता सरनोबत हे २००६ पासून शहर अभियंतापदावर आहेत.