महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्ह्याच्या विविध भागात रविवारी दिवसभर पावसाची संततधार कायम राहिली. कोल्हापूर शहर परिसरालाही पावसाने झोडपून काढले. शहरातील सखल भागात तळयाचे स्वरुप आले आहे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे खड्डयातून वाट काढताना वाहनधारकांचे कंबरडे मोडत आहे. धरणक्षेत्रात पावसाचा जोर असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. राधानगरी धरण ८० टक्के भरले आहे. धरणातून १४५० क्युसेक विसर्ग होत आहे. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथे ३७ फूट ९ इंचावर पोहोचली आहे. इशारा पातळी ३९ फुटाला आहे. दरम्यान जिल्हयाच्या विविध भागात झालेल्या घरांच्या पडझडमुळे नऊ साधारणपणे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दिवसभरातसाठ इंचाने वाढ झाली. पाणी संथगतीने वाढत असले तरी नदीकाठच्या गावात धाकधूक वाढत आहे. प्रशासनाने, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. नदीकाठावरील वस्तीमध्ये स्थलांतराच्या तयारीत आहेत. कोल्हापूरसह राधानगरी, भुदरगड, पन्हाळा, करवीर, चंदगड, गगनबावडा तालुक्यात दिवसभर पाऊस होता. पंचगंगा, वेदगंगा, दूधगंगा, वारणा, धामणी, कुंभी या नद्या पात्राबाहेर पडल्याने पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. ८५ बंधारे पाण्याखाली आहेत. सकाळी दहा वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी ३७ फूट इतकी होती. रात्री आठ वाजता ३७ फूट ९ इंचापर्यंत पाणी पातळी वाढली होती. दहा तासात ९ इंच पाणी वाढले.
हातकणंगले तालुक्यात वारणा नदीवरील निलेवाडी-ऐतवडे खुर्द पुलावर पाणी आल्याने पुलावरील वाहतूक थांबविली आहे. प्रशासनाने दोन्ही बाजूला बॅरिकेटस लावून मार्ग वाहतुकीला बंद केला आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतील वाढ संथअसली तरी ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी आले आहे. शिरढोण-कुरुंदवाड दरम्यानच्या नदीवरील पुलावर पाणी आले. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर खोकुर्ले आणि मांडुकली या ठिकाणी पुराचे पाणी रस्त्यावर आले आहे. कुंभी नदीवरील गोठे येथील पूलही पाण्याखाली गेला आहे.