महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी निरनिराळी कौशल्ये आत्मसात करण्याची गरज आहे. जागतिक स्तरावरील अभियांत्रिकी क्षेत्रातील बदलत्या गरजा जाणायला हव्यात. येत्या काळामध्ये अभियंत्यांना विविध क्षेत्रात उपलब्ध संधीची माहिती घेत त्यादृष्टीने विद्यार्थ्यांना तयारी करणे आवश्यक आहे. केआयटीत विद्यार्थी हिताला प्राधान्य आहे. त्याअनुषंगाने पालक-शिक्षक समन्वय उपयुक्त ठरणार आहे.’असे मत संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली यांनी व्यक्त केले.
केआयटीच्या स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष बी. टेक. साठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांची स्वागत सभा तीन सत्रात उत्साहात पार पडली. सर्व शाखांचे एकूण ९०० पालक उपस्थित होते. केआयटी आयमरचे संचालक विश्वस्त सुनील कुलकर्णी यांनी सर्वप्रथम केआयटी सारख्या दर्जेदार अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्याबद्दल पालकांचे अभिनंदन केले. संस्थेचे सचिव दीपक चौगुले यांनी विद्यार्थ्यांच्या यशस्वी करिअर च्या दृष्टीने संस्थेत सुरु केलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
महाविद्यालयाचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी महाविद्यालयात लागू केलेल्या नवीन शैक्षणिक धोरण २०२० बद्दल थोडक्यात माहिती करून दिली. विद्यार्थी प्रशिक्षण व नियुक्ती अधिष्ठाता डॉ. अमित सरकार यांनी विद्यार्थ्यांना चांगल्या नोकरीच्या संधी मिळण्याच्या दृष्टीने दिल्या जात असणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमाची तसेच भरती साठी येणाऱ्या कंपन्यांची माहिती दिली.
प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ.दत्तात्रय साठे यांनी पालक सभेचा उद्देश व प्रथम वर्ष अभियांत्रिकी मधील शैक्षणिक अभ्यासक्रम व मूल्यमापन पद्धतीची माहिती दिली. या सभेस उपस्थित राहिलेल्या पालकांनी केआयटी मध्ये आपल्या पाल्याला प्रवेश मिळाला ही अभिमानाची बाब असल्याचे सांगून महाविद्यालयातील एकूण शिस्त व सर्व उपक्रमांची माहिती ऐकून समाधान वाटल्याचे नमूद केले. डॉ.दीप्ती कुलकर्णी आणि प्रा. क्षितिजा ताशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रवेश प्रक्रिया प्रमुख डॉ. महेश शिंदे यांनी आभार मानले.