वेळेत कुलगुरुंची नियुक्ती न करणे हा विद्यापीठाची गरिमा घालविण्याचा प्रकार
schedule09 Oct 25 person by visibility 212 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : उच्च शिक्षण क्षेत्रात विद्यापीठाचे अनन्य साधारण महत्व आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात शेकडो कॉलेजियस, हजारो प्राध्यापक, लाखो विद्यार्थी असतात. कुलगुरू हे या यंत्रणेतील प्रमुख आहेत. कुलगुरुविना विद्यापीठ ही संकल्पना पूर्णत:चुकीची आहे. तीन-तीन दिवस विद्यापीठे कुलगुरुविना चालविणे हा प्रकार उच्च शिक्षण क्षेत्रासाठी मारक आहे. विद्यापीठाची गरिमा घालविण्याचा हा प्रकार आहे अशा प्रतिक्रिया उच्च शिक्षण क्षेत्रातील जाणकार, माजी कुलगुरु-प्रकुलगुरू यांनी व्यक्त केल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावांनी स्थापन झालेले विद्यापीठ कुलगुरुविना चालविले हे राज्यकर्त्यांना शोभणारे नाही अशा भावनाही व्यक्त केल्या.
शिक्षणतज्ज्ञ व पाच विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, ‘कुलगुरुविना विद्यापीठ हे चित्रच सहन न होण्यापलीकडील आहे. प्रभारी कुलगुरुपदाचा कार्यभार असो की नियमित कुलगुरुंची निवड प्रक्रिया असो या सगळया गोष्टी नियमानुसार आणि मुदतीत झाल्या पाहिजेत. विद्यापीठाला कुलगुरू नसणे हे अंत्यत चुकीचे आहे. विद्यापीठाची गरिमा घालविण्याचा हा प्रकार आहे. प्रशासकीय कामकाज, धोरणात्मक निर्णय या साऱ्या बाबी कुलगुरुंशी निगडीत असतात. विद्यापीठे ही स्वायत्त आहेत. त्यामध्ये बाह्यशक्ती आणि सरकारचा हस्तक्षेक होऊ नये.’
शिवाजी विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू अशोक भोईटे – शिवाजी विद्यापीठासारखे नामांकित विद्यापीठ दोन-तीन दिवस कुलगुरुविना असणे हे बरोबर नाही. कुलगुरू हे सर्वार्थाने प्रशासकीय प्रमुख असतात. प्रशासकीय प्रमुखच जर नसतील तर प्रशासकीय कामात एक प्रकारची ढिलाई निर्माण होऊ शकते. विद्यापीठाशी निगडीत दैनंदिन कामकाजावर परिणाम संभवतो. महाविद्यालयाचे प्रस्ताव असतील, अधिकार मंडळाच्या बैठका असतील, प्रशासकीय निर्णय असतील या साऱ्या बाबीवर निर्णय होऊ शकत नाही. कुलगुरुसारखे पद हे रिक्त असू नये.
शिवाजी विद्यापीठ प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील : शिवाजी विद्यापीठाच्या ६३ वर्षाच्या इतिहासात अशी स्थिती कधीही उदभवली नव्हती. वास्तविक कुलपती कार्यालय व उच्च शिक्षण विभागाकडून यासंबंधीची कार्यवाही व्हायला हवी होती. प्रभारी कुलगुरुपदाचा कार्यभार वेळेत दुसऱ्यांच्याकडे सोपवायला हवा होता. तीन दिवस कुलगुरुपद रिक्त राहणे हे उच्च शिक्षण क्षेत्रासाठी मारक आहे. पूर्णवेळ कुलगुरू निवडीसाठी अजून शोध समितीची स्थापना झाली नाही. जाहिरात प्रसिद्ध केली नाही. सरकारने सगळया प्रक्रिया जलदगतीने पूर्ण कराव्यात.
मुंबई विद्यापीठ प्राचार्य संघटना अध्यक्ष डॉ. टी. ए. शिवारे : कुलगुरुंचा कार्यकाल संपल्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा कार्यभार रिक्त राहणे हे केवळ महाराष्ट्रातील घटना नाही तर संपूर्ण देशभरातील पहिली घटना आहे. वास्तविक कुलगुरुंचा कार्यकाल संपल्यानंतर प्रभारी कुलगुरु नियुक्तीची तरतूद करायला हवी होती. यापूर्वी चार दिवस अगोदर नावांची घोषणा झालेली उदाहरणे आहेत. कॉलेज, प्राध्यापक, विद्यार्थी संशोधन, परीक्षा, अधिकार मंडळ अशा विविध घटकांशी निगडीत कुलगुपद निगडीत आहे. यामुळे जलदगतीने नियुक्तीची प्रक्रिया झाली पाहिजे.
कासेगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्राचार्य आर. डी. सावंत : कुलगुरुविना विद्यापीठ ही संकल्पना चुकीची आहे. प्रभारी कुलगुरूपद नियुक्ती व पूर्णवेळ कुलगुरु निवडीची प्रक्रिया ठरलेली असते. तरीही शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरु नियुक्ती व पूर्णवेळ कुलगुरु निवडीसाठी दिरंगाई कशासाठी ? कुलपती कार्यालय, राज्यकर्ते, उच्च शिक्षण विभागाचा उच्च शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कशा पद्धतीच आहे हे यामधून स्पष्ट होते. सरकारच्या चुकीच्या धोरणाचा उच्च शिक्षण क्षेत्राला बसू नये. तत्काळ नियुक्तीची प्रक्रिया झाली पाहिजे.