महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतीय जनता पक्ष व ताराराणी आघाडी, ताराराणी पक्ष व जनसुराज्य शक्ती पक्ष मिळून कोल्हापूर जिल्ह्यात ३०० हून अधिक ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर जिल्ह्यातील ४७४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत. यंदाच्या निवडणुकीत सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भाजप व सहयोगी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “भाजप व मित्रपक्षातर्फे ग्रामपंचायतीच्या निवडणुका एकत्रित लढविल्या जातील. आमदार विनय कोरे यांचा जनसुराज्य शक्ती पक्ष, आमदार प्रकाश आवाडे यांचा ताराराणी पक्ष आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांची ताराराणी आघाडी अशी समविचारी पक्ष एकत्र येउन निवडणूक लढवू. या निवडणुकीत ३०० हून अधिक ठिकाणी भाजप व मित्रपक्षाचे सरपंचपदाचे उमेदवार निवडून येतील. गावपातळीवरील राजकारण हे गटातटाचे व आघाडयांचे असते. परस्परामध्ये समन्वय ठेवून अधिकाधिक सरपंच निवडून आणू.’
खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, नाथाजी पाटील, जिल्हा परिषदचे माजी सदस्य राहुल चिकोडे आदी उपस्थित होते.