महाराष्ट् न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पावसाळयात साथीचे आजार उद्भभवू नयेत यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्या आहेत. जलजन्य आजार व किटकजन्य आजाराचा उद्रेक होऊ नये यासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी कृती आराखडा तयार केला आहे असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड यांनी सांगितले.
पावसाळ्यात साथीच्या आजारांचा उद्रेक होऊ नये म्हणून विविध उपाययोजना करताना जिल्हास्तरावर आपत्कालिन कक्षाची स्थापना केली आहे. हा कक्ष चोवीस तास सुरू असेल. जिल्हास्तरावरुन अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेतले आहे. जिल्ह्यातील अति जोखमीच्या भागातील गरोदर मातांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी सूचना केल्या आहेत. असे गायकवाड यांनी सांगितले. जलजन्य आजार व किटकजन्य आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी ग्रामपंचायतींना सूचना केल्या आहेत. नागरिकांमध्ये आरोग्य विषयक प्रबोधन करावे अशा सूचना केल्या आहेत.
पत्रकार परिषदेला अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी संजय रणवीर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रश्मी माळगावकर, जिल्हा क्षयरोग्य अधिकारी वंदना वसावे, वैद्यकीय अधिकारी माधव ठाकूर आदी उपस्थित होते.
………………….
सहा महिन्यात जलजन्य आजाराचे ४६२ रुग्ण
२०२४ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात जलजन्य आजारामुळे ४६२ रुग्ण आढळले आहेत. तर किटकजन्य आजारामुळे सात रुग्ण बाधित आहेत. डेंग्यू संशयित एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. जून २०२४ मध्ये जलजन्य साथीच्या आजाराचे चौदा रुग्ण आढळले आहेत. किटकजन्य आजाराचे तेरा रुग्ण आढळून आले.