कर्नाटकने दाखविले, आता महाराष्ट्राची जनता ताकत दाखवेल ! अजित पवारांनी शिंदे-फडणीस सरकारला ठणकावले !!
schedule20 May 23 person by visibility 654
categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘सरकार येते आणि जाते, मात्र सत्तेची मस्ती, सत्तेची नशा आणि गैरवापर डोक्यात शिरू देऊ नका. वेडेवाकडे आणि घाणेरणे राजकारण करण्यापेक्षाा बेरजेचे राजकारण करा, समज्यंस भूमिका घ्या. जनता जनार्दन मोठी आहे. कर्नाटकच्या जनतेने विधानसभेच्या निवडणुकीत ताकत दाखविली आहे, महाराष्ट्राची जनताही आगामी निवडणुकीत ताकत दाखवून देईल. कोणीही सत्तेचे ताम्रपट घेऊन आले नाही’असा सज्जड दम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला ठणकावले.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांचे चिरंजीव व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अभिषेक डोंगळे यांनी सुरू केलेल्या ‘चिरंजीवी’या हॉटेलचा उद्घाटन समारंभ शनिवारी (ता.२०) झाला. राष्ट्रवादीचे नेते पवार यांच्या हस्ते हॉटेलचे उद्घाटन झाले. खासदार संजय मंडलिक, राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आमदार राजेश पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार के. पी. पाटील, संजय घाटगे, राजू आवळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, गोकुळचे विद्यमान चेअरमन विश्वास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. नवीन वाशी नाका, राधानगरी रोड येथे हा कार्यक्रम झाला.
राष्ट्रवादीचे नेते पवार यांनी अभिषेक डोंगळे यांना हॉटेल व्यवसायाविषयी शुभेच्छा दिल्या. ‘ग्राहकांना उत्तम सेवा, आदरतिथ्य, आणि गुणवत्तापूर्ण जेवण देत हॉटेलचा नावलौकिक वाढवा.’अशा शुभेच्छा देत पवार म्हणाले, ‘ कोल्हापूर जिल्ह्यात विकासाची क्षमता आहे. निसर्गाची देणं आहे, उद्यमशीलता आहे. जगात भारी आम्ही कोल्हापुरी हा लौकिक आहे. मात्र गेल्या काही वर्षात विकासात्मक पातळीवर तुलना करताना बेळगाव शहर कोल्हापूरच्या पुढे गेले. याचा कोल्हापूरकरांनी अंतर्मुख होऊन विचार करुन विकासाची, प्रगतीची वाटचाल करायला हवी.’
राज्यातील सध्याच्या राजकारणावरुनही पवार यांनी शिंदे, फडणवीस सरकारला फटकारले.अकोला, शेवगाव आणि त्र्यंबकेश्वर येथील घटनांचा संदर्भ देत पवार म्हणाले, ‘ महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्येवरील लक्ष हटविण्यासाठी राज्यात जाणूनबुजून वाद निर्माण केले जात आहेत. नको त्या गोष्टींची चर्चा घडविली जात आहे. नको त्या गोष्टी जनतेच्या डोक्यात घालत आहेत.राज्यात कायदा-सुव्यवस्था टिकली पाहिजे. जातील सलोखा राहिला पाहिजे, लोकांना सुरक्षित वाटले पाहिजे. या पद्धतीने राज्यकर्त्यांचा कारभार हवा. मात्र सध्याच्या राज्यकर्त्यांचा तसा कारभार दिसत नाही. भ्रष्टाचार वाढला आहे. विकासाऐवजी आडमुळेपणाचे आणि अडवणुकीचे धोरणे राबविले जात आहे. आम्ही सत्तेत असताना विरोधकांची कामे अडविली नाहीत. पण शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेवर आल्यावर महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीतील विकासकामांना स्थगिती दिली. पण राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे, ज्या गावच्या बाभळी त्याच गावच्या बोरी असतात. चार दिवस सासूचे असतात, चार दिवस सुनेचे असतात.”
ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी स्वागत झाले. अभिषेक डोंगळे यांनी प्रास्ताविक करताना हॉटेलची माहिती दिली. शिक्षक संदीप मगदूम यांनी सूत्रसंचालन केले. संदीप डोंगळे यांनी आभार मानले. याप्रसंगी उद्योगपती व्ही. बी. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने,बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, गोकुळचे संचालक शशिकांत पाटील चुयेकर, बाळासाहेब खाडे, अजित नरके, चेतन नरके, अमर पाटील, नंदकुमार ढेंगे, बयाजी शेळके, रणजित पाटील, प्रा. किसन चौगले, अंजना रेडेकर, प्रकाश पाटील, अंबरिश घाटगे, अंजना रेडेकर, बाबासाहेब चौगुले, बी. के. डोंगळे, किशाबापू किरुळकर, गोपाळराव पाटील, धीरज डोंगळे, शारंगधर देशमुख, गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले आदी उपस्थित होते.