महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : " कोल्हापूर शहरांतर्गत वाहतुकीची समस्या टाळण्यासाठी उड्डाणपुलासह रस्ते कामांचा सविस्तर प्रकल्प अहवाल डी पी आर तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केले आहेत. शिवाय कोल्हापूर ते सांगली हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्यात येईल. या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर पन्नास वर्षात एकही खड्डा पडणार नाही अशा पद्धतीने त्याची बांधणी होईल."अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या बास्केटब्रीजच्या पायाभरणी समारंभाच्या कार्यक्रमात केंद्रीयमंत्री गडकरी बोलत होते. याप्रसंगी रत्नागिरी ते कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरी कामाचा भूमिपूजन समारंभ झाला. सांगली फाटा येथे आयोजित केलेल्या या समारंभामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाच्या आधारे बास्केट ब्रिज आणि चौपदरी रस्त्याच्या कामांचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमांमध्ये रस्ते, वाहतूक, दळणवळण या अनुषंगाने खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशिल माने, सांगलीचे खासदार संजय पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे वेगवेगळ्या मागण्या केल्या. या सगळ्या मागण्यांची पूर्तता करू अशी ग्वाही गडकरी यांनी देत उपस्थितांची मने जिंकली.
गडकिल्ल्यासाठी रोप वेची सुविधा, हातकणंगले तालुक्यात आयात निर्यात केंद्रची (पोर्ट) उभारणी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही असेही गडकरी आणि सांगितले. 180 कोटी रुपये खर्चून सांगली फाटा ते शिरोली जकात नाका असा बास्केट ब्रिज होणार आहे. या बास्केट ब्रिजमुळे कोल्हापूरची वेगळी ओळख निर्माण होईल. वाहतूक सुरळीत होईल. भविष्यात कितीही मोठा महापूर आला तरी कोल्हापूरची कितीही मोठा महापूर आला तरी कोल्हापूरची वाहतूक सुरळीत राहील. लोकांना कसलाही त्रास होणार नाही."असे गडकरी यांनी सांगितले. पालकमंत्री दीपक केसरकर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह चारही खासदाराने आपल्या भाषणांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविषयी कौतुकोदगार काढले. विकासपुरुष अशा शब्दात त्यांचा गौरव केला. खासदार महाडिक यांनी भाषणात कोल्हापूर शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सात मार्गावर उड्डाणपूलांची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावर बोलताना केंद्रीय मंत्री गडकरी यांनी उड्डाणपुलासह शहरांतर्गत रस्त्यासाठी निधी देऊ दरम्यान भूसंपादनाची जबाबदारी राज्य सरकारने उचलावी असे सांगितले.
कार्यक्रमाला आमदार पी. एन. पाटील, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, भाजपचे प्रदेश पदाधिकारी मकरंद देशपांडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक, भाजप महानगरचे अध्यक्ष राहुल चिकोडे, माजी नगरसेवक प्रा. जयंत पाटील, सत्यजित कदम जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण इंगवले, राहुल आवाडे, शिरोलीच्या लोकनियुक्त सरपंच पद्मजा करपे आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थित होती.