महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : "सध्या कोल्हापुरातील रस्त्यांची शहर अभियंत्यांच्या माध्यमातून होणारी कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत. या विरोधातच काँग्रेस आघाडीने आंदोलन केले होते. मात्र भाजपचे टोळके अप्रत्यक्षपणे शहर अभियंत्याची पाठराखण करत आहे. याचा अर्थ भाजपच्या माजी नगरसेवकांना शहरात होणारी निकृष्ट दर्जाची कामे मान्य आहेत, असा घ्यायचा का? " असा पलटवार काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला. तसेच कोणतीही निवडणूक जवळ आली की काँग्रेस पक्षाच्या नावाने खडे फोडण्याची सुपारी त्या टोळक्यांना दिली जाते अशी बोचरीरी ठीक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
भाजप ताराराणी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी, सोमवारी पत्रकार परिषदेत खराब रस्त्यावरून काँग्रेसने केलेली आंदोलन म्हणजे नौटंकी असा आरोप केला होता. दरम्यान काँग्रेसचे माजी महापौर निलोफर आजरेकर, स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत भाजपच्या माजी नगरसेवकांनी केलेल्या आरोपाचा समाचार घेतला. भाजप पदाधिकाऱ्यांनी पुरावासहित आरोप करावेत, बिनबुडाचे आरोप करून बदनामी केल्यास अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू असा इशारा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिला. देशमुख चव्हाण म्हणाले, " कोल्हापूरातील खराब रस्त्याबददल काँग्रेसच्या नगरसेवकांनी शहर अभियंत्यांना जाब विचारल्यावर आम्ही हे रस्ते तीन वेळा दुरुस्त करुन घेतले, असे त्यांनी मोठ्या अभिमानाने आम्हांला सांगितले. जनतेच्या पैशातून होणारे हे रस्ते चांगल्या दर्जाचे व्हावेत, ही शहर अभियंत्यांची जबाबदारी नाही का? हे सगळे सोडून आम्ही जाब विचारला म्हणून भाजप माजी नगरसेवकांच्या भ्रष्ट टोळक्याला वायफळ मुद्दे देवून आमच्यावर आरोप करायचा फंडा शहर अभियंता जर वापरत असतील तर त्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागेल. भ्रष्टाचारावर बोट ठेवणारे भ्रष्टाचारी नसतात, तर शहर अभियंत्यांच्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारे महाभाग हेच खरे भ्रष्टाचारी आहेत."
काँग्रेसचे पदाधिकारी म्हणाले "लोकप्रतिनिधींच्या मार्फत दिलेल्या निधीचे योग्य नियोजन करुन चांगल्या दर्जाचे कामे करुन घेणे हे महापालिकेचे शहर अभियंता आणि त्यांच्या विभागातील कर्मचाऱ्यांचे काम असते. पण त्यांनी कामे अत्यंत दर्जाहीन पध्दतीने करुन घेतल्याने कोल्हापूरकरांना प्रचंड त्रास होत आहे. रस्त्यांची दुर्दशा लक्षात आणून देण्यासाठी शहर अभियंत्यांना आम्ही वारंवार सूचना दिल्या, अनेक बैठका घेतल्या पण त्यामध्ये कोणताही फरक पडला नाही. यामुळेच आंदोलन करावे लागले. या आंदोलनाची दखल घेवून जर कामामध्ये सुधारणा झाली नाही तर आम्हांला पुन्हा तीव्र आंदोलन करावे लागेल.
भाजपच्या माजी नगरसेवकांनी शहराच्या विकासासाठी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांनी डीपीडीसी, नगरोत्थान योजना निधीतून निधी दिल्याचे मान्य केले आहे. मग तुमचे नेते असणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या मागील आणि सद्याच्या सत्ता काळामध्ये शहरासाठी किती निधी दिला ? हे एकदा जाहीर करा.
कोणतीही निवडणूक आली की भाजपमधील या टोळक्याला काँग्रेस पक्षाच्या नावाने खडे फोडण्याची सुपारी पक्षाकडून दिली जाते. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडून आरोप सुरु आहे. त्यांनी आरोप सिध्द करुन दाखवावेत. तसेच महापालिका प्रशासनाने सुध्दा शहानिशा करुन वस्तुस्थिती कोल्हापूरच्या जनतेसमोर मांडावी.