स्वतःच्या आवडीचे करिअर निवडा, यशस्वी भविष्य घडवता येते : रविंद्र खैरे
schedule24 Jun 25 person by visibility 40 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ करिअर निवडताना केवळ आजच्या संधी नव्हे तर उद्याच्या गरजा आणि स्वतःच्या आवडीनुसार निर्णय घेणे अत्यंत गरजेचे आहे. योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेने प्रयत्न केल्यास कोणतेही क्षेत्र चांगले करिअर घडवू शकते,’ असे मत रविंद्र खैरे यांनी व्यक्त केले. राधानगरी तालुक्यातील तिटवे येथील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले होते. कार्यशाळेत दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रातील संधी, कौशल्यांची गरज, बदलते तंत्रज्ञान आणि त्याचे भविष्यातील परिणाम यासंबंधी मार्गदर्शन केले. “स्वतःची आवड ओळखून शिक्षणाची दिशा ठरवली, तर कामात समाधान मिळते आणि यशाची शक्यताही अधिक वाढते.” असे आवाहन करत खैरे यांनी केले. तसेच शिक्षण क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, पर्यावरणविषयक अभ्यास, मीडिया आणि उद्योजकता या क्षेत्रांमध्ये वाढत्या संधींबाबत त्यांनी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तरे सत्रात आपले शंका मोकळेपणाने मांडल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. शुभांगी भारमल यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्राचार्य बाबासाहेब कांबळे, प्राचार्य सरिता धनवडे,उपप्राचार्य सागर शेटगे, प्रा. विशाल कांबळे,अभिजित फराकटे, धीरज पाटील, योगेश राजगिरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयन प्रा.अविनाश पालकर यांनी केले.