महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्याा् सूचनेनुसार एक एप्रिल ते ३० जून २०२३ या कालावधीत जिल्हा प्रशासन, अग्रणी जिल्हा बँक व इतर सर्व व्यापारी बँका, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि ग्रामपंचायत प्रशासन यांच्या समन्वयाने ग्रामपंचायत स्तरावर “जनसुरक्षा मोहीम” राबविण्यात येत आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील नागरिकांनी प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना व प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.
या योजनांमध्ये जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांना व्यापक स्वरुपात सामावून घेण्यासाठी भारत सरकारच्या सूचनेनुसार ग्रामपंचायत स्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे वेळापत्रक संबंधित ग्रामपंचायतींमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहे. संबंधित ग्रामपंचायतींमध्ये हे शिबिर सकाळी १०.३० ते दुपारी चार या वेळेत सुरु राहील. या दोन्ही योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांनी आपले बँक पासबुक व केवायसी कागदपत्रे जसे की, पॅनकार्ड/आधार कार्ड, मतदान ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे सोबत घेऊन शिबिरास भेट देवून या योजनांमध्ये आपली नोंदणी करावी.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही एक वर्षाचे विमा संरक्षण असणारी अपघाती मृत्यू आणि अपंगत्व यासाठी 2 लाखापर्यंत विमा संरक्षण देणारी योजना आहे. यामध्ये १८ ते ७० वर्षे वयोगटातील व्यक्ती सहभागी होवू शकतात. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत वार्षिक हप्ता २० रुपये प्रती व्यक्ती प्रती वर्षी इतका अल्प आहे. विमा धारकाचा मृत्यू झाल्यास अथवा दोन्ही डोळ्यांची संपूर्ण अथवा बरी न होणारी हानी झाल्यास किंवा दोन्ही हात अथवा दोन्ही पाय निकामी झाल्यास दोन लाख रुपये इतकी भरपाई मिळते. तसेच या योजनेमध्ये एका डोळ्याची संपूर्ण आणि बरी न होणारी हानी किंवा एक हात व एक पाय निकामी झाल्यास एक लाख रुपये इतकी भरपाई मिळते.
प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना ही नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपयापर्यंत विमा संरक्षण देणारी योजना आहे. यामध्ये १८ ते ५० वर्षे वयोगटातील व्यक्ती सहभागी होवू शकतात. विमा धारकाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास वारसाला दोन लाख रुपये इतकी भरपाई मिळते. प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेअंतर्गत वार्षिक हप्ता ४३६ रुपये इतका प्रती व्यक्ती प्रती वर्षी आहे.