सतीश घाटगे, महाराष्ट्र न्यूज 1 :
घातपाती कारवायाच्या धोका लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारने देशात अलर्ट दिला आहे. असे असताना ऐन सणासुदीच्या काळात सुरक्षेच्या दृष्टीने कोल्हापूर शहरात उभारण्यात आलेले १६५ पैकी १६३ कॅमेरे बंद असून दोन कॅमेरे कसेबसे सुरु आहेत. त्यामुळे कोल्हापूरची सुरक्षितता धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कर्नाटक आणि गोवा राज्याला लागून असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याचे महत्त्व मोठे असल्याने इथली सुरक्षा व्यवस्था प्रबळ रहावी असा पोलीस प्रशासनाचा कायम प्रयत्न असतो. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर, ज्योतिबासह जिल्ह्यातील धरणावर कायम बंदोबस्त ठेवावा असे आदेश यापूर्वी सुरक्षा यंत्रणांनी दिलेले आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात ६५ ठिकाणी १६५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. राज्य सरकार जिल्हा नियोजन मंडळ आणि महानगरपालिकेच्या निधीतून हे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामध्ये १६५ कॅमेरा असून त्यापैकी पीटी झेड १७ कॅमेरे, पॅनोरमिक ३२ , तर ११६ फिक्स कॅमेरे आहेत. या कॅमेऱ्याचा मेंटेनन्स एका खाजगी संस्थेकडे आहे पहिली पाच वर्षे कॅमेर्यांची देखभाल कोल्हापूर महानगरपालिकेची करण्यात येत होती. सहा वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे देखभाल व सर्व यंत्रणा पोलीस प्रशासनाकडे वर्ग करण्यात आली आहे. पण निधी अभावी सीसीटीव्हीचा मेंटेनन्स ठेवण्याचे काम बंद झालेले आहे.
सीसीटीव्हीचा मेंटेनन्स ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने राज्य सरकारकडे निधीची मागणी केली आहे .पण गेली दोन महिने राज्यात सत्तांतराचा प्रयोग सुरू असल्याने हा निधी मंजूर झालेला नाही. त्यामुळे शहरातील १६५ पैकी १६३ कॅमेरे बंद आहेत. दोन कॅमेरे फक्त सुरू आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून शहरावर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस मुख्यालयात एक स्वतंत्र विभाग करण्यात आला आहे. त्यामध्ये पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक , निरीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पण सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे या विभागाचे कामच ठप्प झाले आहे
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देशभर अलर्ट देण्यात आला होता. आज गुरुवारी रायगड श्रीवर्धन येथे एका बेवारस बोटीमध्ये शस्त्रास्त्रांचा साठाही सापडला आहे. राज्यात अलर्ट देण्यात आला आहे. कोल्हापुरी पोलीस अलर्ट झाले आहे पण सीसीटीव्ही बंद असल्याने पोलिसांसमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुन्ह्याच्या तपासात अडचणी निर्माण झाले आहेत. शहरातील वाहतूक कोंडी वर नियंत्रण ठेवण्याचे कामही अवघड झाले आहे. पुढील तीन महिन्यात गणेश उत्सव ,दसरा ,दिवाळी हे महत्त्वाचे सण येतात ,नवरात्र उत्सवात देश परदेशातील भाविक मोठ्या संख्येने कोल्हापूर शहरात येतात. अशा पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील सीसीटीव्ही सुरू होण्याची गरज आहे. राज्य सरकारने ताबडतोब निधी मंजूर केला तर गणेशोत्सव काळात शहरातील सर्व सीसीटीव्ही सुरू होऊन पोलीस प्रशासनाला मदत होऊ शकते आणि कोल्हापूरची सुरक्षा पुन्हा बळकट होऊ शकते.