व्हिनस कॉर्नर, कुंभार गल्ली, मुक्तसैनिक वसाहतला फटका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पावसाने शनिवारी (२७ जुलै) सकाळपासून पावसाची उघडीप दिली आहे. मात्र धरणक्षेत्रातील पाऊस आणि धरणातून पाण्याचा विसर्ग यामुळे नद्यांची पाणी पातळी वाढत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ९८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीची पाणी पातळी दुपारी एक वाजता ४७ फूट पाच इंचापर्यत वाढली आहे. पंचगंगेच्या महापुराचे पाणी आता कोल्हापूर शहरात पसरू लागले आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी चर्चा केली. आपत्तीग्रस्त लोकांना तातडीने मदत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना केल्या.
राधानगरी धरणाचे चार दरवाजे खुले असून धरणातून ७२१७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. शुक्रवारी रात्री दहा वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी ४६ फूट दोन इंच होती. शनिवारी दुपारी एक वाजेपर्यंत एका फुटाहून अधिक पाणी वाढले. जयंती नाला परिसरातील खानविलकर पेट्रोल पंप येथे पाणी आले. व्हिनस कॉर्नर परिसरातही पाणी पसरले आहे व्हिनस कॉर्नर ते दसरा चौककडे जाणाऱ्या रस्त्यावर जाणाऱ्या पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे. शाहूपुरीतही जयंती नाल्याचा फटका बसला आहे. शाहूपुरी सहाव्या गल्लीत पाणी शिरले आहे. या भागातील मूर्तीकारांना गणेश मूर्ती सुरक्षितस्थळी हलवाव्या लागल्या. शुक्रवार पेठेतही जवळपास पन्नास घरात पाणी शिरले आहे. रमणमळा, बापट कॅम्प, मुक्त सैनिक वसाहत येथेही नागरी वस्तीत पाणी शिरले आहे. दरम्यान अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील दहा राज्यमार्ग व ४८ प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण ५८ मार्ग बंद झाले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.