राजेश क्षीरसागरांनी घेतले रोजंदारी कर्मचाऱ्याच्या घरी भोजन ! सिद्धार्थनगरमधील काळे कुटुंबीय भावूक !!
schedule14 Oct 24 person by visibility 269
categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गेली ३० वर्षे प्रलंबित असलेला रोजंदारी कर्मचाऱ्याना महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचा प्रश्न राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मार्गी लावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पहाटे ५ वाजता कर्मचाऱ्याना सेवेत कायम करण्याच्या निर्णयावर सही घेवून तो आदेश परवा स्वत: महापालिकेकडे सादर केला. त्या पाठोपाठ त्यांनी, रविवारी रात्री रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या घरी भेट दिली. त्यांच्यासोबत भोजन घेतले.
सिद्धार्थनगर येथील संजय काळेहे गेली ३० वर्षे रोजंदारी कर्मचारी म्हणून काम करतात. रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी करण्याच्या निर्णय झाल्यावर काळे यांनी क्षीरसागर यांना फोन केला. "आयुष्यभरासाठी जी नवीन भाकरी मिळाली ती तुमच्यामुळे. या भाकरीचे खरे मानकरी आपण आहात ती तुम्ही स्वत: आमच्यासोबत खायला या" अशी विनंती केली. हे काम आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे काम असून, कर्मचाऱ्याना न्याय दिल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे सांगत राजेश क्षीरसागर यांनी हे आग्रहाचे आमंत्रण स्वीकारले.
रविवारी रात्री क्षीरसागर हे रोजंदारी कर्मचारी संजय काळे यांच्या घरी गेले. यावेळी काळे कुटुंबियांच्या वतीने फुलांचा वर्षाव करत क्षीरसागर यांचे स्वागत केले. क्षीरसागर यांनी कुटुंबातील जेष्ठ नागरिकांची आपुलकीने विचारपूस करून आशीर्वाद घेतला. यावेळी काळे कुटुंबियातील महिला भावूक होवून आपला आनंद व्यक्त केला. यानंतर क्षीरसागर यांनी संजय काळे व कुटुंबियांच्या सोबत स्नेहभोजनाचा आनंद लुटला. यावेळी रंगलेल्या गप्पा गोष्ठीमध्ये सिद्धार्थनगर मधील नागरिकांनी क्षीरसागर कुटुंबीयांनी महापूर आणि कोरोना कालावधीत केलेल्या मदतीचा विशेष उल्लेख करून क्षीरसागर यांचे आभार मानले. राजेश क्षीरसागर यांनीही गेल्या काही वर्षापूर्वी माझ्याबद्दल चुकीचा गैरसमज निर्माण केला गेला. पण, हा गैरसमज नागरिकांनी मनातून काढावा असे आवाहन करत सिद्धार्थनगर मधील जुन्या आठवणीना उजाळा दिला. यावेळी रोजंदारी कर्मचारी संजय काळे यांच्या कुटुंबियांसह शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, निलेश हंकारे आदी भागातील जेष्ठ नागरिक व महिला उपस्थित होत्या.