प्लास्टिक मुक्तीचे मॉडेल ! १०० दिवसात प्लास्टिक दूर... नक्की करणार आमचं कोल्हापूर!!
schedule01 Sep 25 person by visibility 122 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात २५ ऑगस्ट ते ३ डिसेंबर २०२५ या कालावधीत १०० दिवस प्लॅस्टिक मुक्ती अभियान राबवण्यात येत आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून या अभियानांतर्गत ‘१०० दिवसात प्लास्टिक दूर... नक्की करणार आमचं कोल्हापूर’ या टॅग लाईनचा प्रचार, प्रसार करण्यात येणार आहे.
ज्याप्रमाणे चहासाठी प्लास्टिक कपांचा वापर बंद झाला आहे. त्याचप्रमाणे इतर ठिकाणीही आता प्लास्टिक पिशवी बंद करण्यासाठी १०० टक्के नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. प्लास्टिक कपातून चहा पिल्याने आरोग्यास धोका आहे ही बाब प्रत्येकाला पटली. तशीच परिस्थिती प्लास्टिक पिशवीसाठी देखील घडावी. यासाठी प्रत्येकाने सोबत तसेच खिशात, गाडीच्या डिक्कीत कापडी पिशवी ठेवावी अशी सूचना करण्यात आली. कापडी पिशवी सोबत असणे कमीपणाचे लक्षण नाही, तो अपमान नाही तर तो सन्मान आणि अभिमान वाटवा. या एका लहान बाबीमुळे प्लास्टिकचा वापर निम्म्यापर्यत कमी होईल.
कोल्हापूर जिल्ह्यात प्लास्टिक बंदी अभियान ग्रामीण व शहरी स्थानिक स्वराज्य संस्था व त्यांची कार्यालये, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, क्रीडा संस्था, माध्यमे, मंदिरे, उद्योजक, व्यापरी, हॉटेल, फेरीवाले, विविध संस्था, संघटना, विविध गट, बचतगट, केटरींग, व्यावसायिक, फेरीवाले संघटना, एमआयडीसी, किरकोळ फळ-फुले-भाजीपाला विक्रेते आदींच्या सहभागातून राबवण्यात येणार आहे. प्लास्टिक मुक्त कुटुंब अभियान शाळेतून सुरू होणार.
अभियानतंर्गत सरकारी तसेच खाजगी सार्वजनिक कार्यक्रमात यापुढे प्लास्टिक वापराच्या विरोधात जनजागृतीसाठी दोन शब्द बोलण्याचे ठरले. जिल्हाधिकारी कार्यालयात प्लास्टिक मुक्ती अभियानसंबंधी संयुक्त बैठक झाली. प्रत्येकाच्या घरापासून जागतिक स्तरावर वाढलेल्या प्लास्टिकच्या अतिवापरामुळे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी येणाऱ्या शंभर दिवसात कोल्हापुरातून प्लास्टिक मुक्तीचे आदर्श मॉडेल तयार करूया असे आवाहन जिल्हाधिकारी येडगे यांनी केले. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. जिल्हा सह आयुक्त नागेंद्र मुतकेकर उपस्थित होते. बैठकीत संजय शेटे, राहुल मगदूम, विदुला स्वामी, दिलीप पोवार, उदय गायकवाड, संजीव चिपळूणकर, आदिनी विविध सूचना मांडल्या.
………….
“ ग्रामीण भागात प्लास्टिकचा वापर वाढलेला असून प्लास्टिक बंदी साठी आवश्यक सहकार्य करण्याचे आवाहन केले. आपल्या व आपल्या पुढील पिढी साठी या उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा. कोल्हापूरकर नेहमीच आपल्या कामातून इतरांना प्रेरणा देतात.”
-कार्तिकेयन एस. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद