जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणाने काम करुन व्यक्तिमत्वाची उंची वाढवावी-प्रकाश आबिटकर
schedule26 Jun 25 person by visibility 51 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘कोणत्याही क्षेत्रातील पुरस्कार हा कामाची पोचपावती असून आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा पुरस्कारामुळे मिळते. जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन प्रामाणिकपणे काम करुन कामातून आपल्या व्यक्तिमत्त्वाची उंची वाढवावी. कोल्हापूरचे नाव उज्ज्वल करण्यासाठी सर्वजण मिळून काम करु या.’ असे आवाहन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा परिषदेतर्फे उल्लेखनीय काम करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना राजर्षी छत्रपती शाहू पुरस्काराचे व आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराचे वितरण करण्यात आले. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सर्किट हाऊस येथील राजर्षी शाहू सभागहात हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी सतरा कर्मचाऱ्यांना राजर्षी शाहू पुरस्कार तर तेरा पत्रकारांना आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार वितरित केले. खासदार शाहू महाराज छत्रपती, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ई सर्व्हिस बुक, पशुधनातील लिंग निर्धारित रेत मात्रा पुरवठा, भविष्य निर्वाह निधी संगणक वेब व मोबाईल प्रणालीचा ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना पालकमंत्री आबिटकर यांनी, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चांगले काम सुरु असून या कामाला आणखी गती देऊया, असे आवाहन करुन आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता तालुकास्तरीय पुरस्काराची रक्कम पाच हजारावरून दहा हजार रुपये करावी तर जिल्ह्याच्या पुरस्काराची रक्कम दहा हजारावरून पंचवीस हजार रुपयापर्यंत वाढवावी.’अशी सूचना केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी प्रास्ताविकातून विविध उपक्रमांची माहिती दिली. पशुधनातील लिंग निर्धारित रेत मात्रा पुरवठा व ई सर्व्हिस बुक तयार करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद ही सर्व कर्मचाऱ्यांची सेवापुस्तक डिजिटल स्वरूपात ठेवणारी पहिली शासकीय संस्था ठरली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी आभार मानले.