Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
चौथीपर्यंतचे शिक्षण मातृभाषेतूनच हवे, पाचवीपासून हिंदी शिकवण्यास हरकत नाही –शरद पवारशक्तीपीठ महामार्ग विरोधात एक जुलैला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनधनंजय महाडिकांसहित भाजपा पदाधिकाऱ्यांकडून राजर्षी शाहू महाराजांना अभिवादनतळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला- डॉ.जब्बार पटेलजिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणाने काम करुन व्यक्तिमत्वाची उंची वाढवावी-प्रकाश आबिटकरलग्नात रुखवतासोबत पुस्तकाचे कपाट, अक्षताबरोबर राजर्षी शाहूंचे पुस्तक द्या– डॉ. जयसिंगराव पवारशिरीष सप्रे म्हणजे जगतमित्र, माणसं जोडणारे सुसंवादी व्यक्तिमत्व -शरद पवारांनी जागविल्या आठवणीकोल्हापुरी चप्पलच्या रक्षणासाठी कृष्णराज महाडिकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट गोकुळमध्ये राजर्षी शाहू महाराजांची १५१ वी जयंती साजरीशक्तीपीठ महामार्गप्रश्नी मुश्रीफ, आबिटकरांच्या मंत्रीमंडळातील भूमिकेवर साशंकता-सतेज पाटलांचा हल्लाबोल

जाहिरात

 

शिरीष सप्रे म्हणजे जगतमित्र, माणसं जोडणारे सुसंवादी व्यक्तिमत्व -शरद पवारांनी जागविल्या आठवणी

schedule26 Jun 25 person by visibility 79 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  ‘उद्योजक शिरीष सप्रे म्हणजे बहुआयामी, सर्वस्पर्शी व बहुरंगी व्यक्तिमत्व. समाजात जे कुणी गुणी आहेत, कुठल्याही क्षेत्रात जे जाणकार आहेत, त्यांच्याशी सुसंवाद हे त्यांचे वैशिष्ट्य होतं. ते माणसं जोडणारे गृहस्थ होते.माझ्याकडे कधीतरी आल्यानंतर अनेक गोष्टींवर चर्चा करायचे. कला, संगीत, क्रिकेट, पर्यावरण या साऱ्यांशी त्यांच संबंध होता. ते जसे उद्योजक होते, तसे कलेचेही भक्त होते. संगीत हा त्यांच्या अत्यंत आवडीचा विषय. पर्यावरणाशी संबंध, खेळाशी संबंध, उद्योगाशी संबंध आणि या सगळ्यांपेक्षा सर्वसामान्य माणसांशी सुसंवाद, हे त्यांचं वैशिष्ट्य होतं.’अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आठवणींचा एकेक पैलू उलगडले.

     निमित्त होतं,  कै. शिरीष सप्रे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे. श्रीमती सुस्मिता सप्रे, राजसी सप्रे- जाधव,  आदित्य जाधव आणि गुणीदास फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘प्रिय शिरीषसप्रेम’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ गुरुवारी कोल्हापुरात पार पडला. पंडित हरिप्रसाद चौरासिया, तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, अभिनेता किशोर कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात साऱ्याच वक्त्यांनी, शिरीष सप्रे यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. यामुळे संपूर्ण समारंभाला एक भावनिक किनार लाभली होती.

याप्रसंगी बोलताना पवार यांनी भाषणात ‘एक वर्ष होऊन गेलं ते आपल्यातून गेले. कधी अपेक्षा केली नव्हती की, ते एवढ्या लवकर जातील. त्यांचा जायचा अधिकार नव्हता. त्यांनी कारण नसताना घाई केली. त्यांनी जायला नको होतं, पण ते गेले. पण ते गेले तर त्यांचं विस्मरण ज्यांना ते ओळखतात आणि जे त्यांना ओळखतात त्यांना कधी आयुष्यात होणार नाही.या पुस्तकाच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमध्ये सप्रे यांच्या जीवनाचे पैलू हे आपल्याला बघायला मिळतील. त्यांच्याबद्दलची अनेकांची मतं वाचायला मिळतील. आपल्याला नक्की हे वाटेल की, त्यांनी एवढ्या लवकर जायला नको होतं.’असे भावोत्कट उदगार काढताच संपूर्ण सभागृह स्तब्ध बनले.

पवार यांनी भाषणाच्या प्रारंभी, ‘आजचा दिवस एक आगळावेगळा असा दिवस आहे. आजचा दिवस कोल्हापूर राज्याचा नावलौकिक कर्तुत्वानं ज्यांनी सबंध देशामध्ये पोहोचवला, त्या राजर्षी शाहू महाराजांचं स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. याबरोबरच कोल्हापूर संस्थानला एक योग्य विकासाची दिशा दाखवण्यासाठी ज्यांनी अत्यंत मोलाची कामगिरी केली, त्या भास्करराव जाधव यांचे सुद्धा स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. या दिवशी ज्यांनी आयुष्यातला फार थोडा काळ ज्यांना मिळाला. ज्यांचा उल्लेख जगत मित्र म्हणून केला तर अतिशयोक्ती होणार नाही, अशा शिरीष सप्रे यांचं स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे.’अशा शब्दांत आठवणींचा कप्पा उलगडला. प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्याशी त्यांचा संवाद होता. अनेक क्षेत्रातील मंडळींशी ते सुसंवाद ठेवायचे असेही पवार यांनी भाषणात नमूद केले. पुस्तकाचे मानद संपादक व अभिनेते किशोर कदम यांनी शिरीष सप्रे यांच्याविषयी अनेकांनी शब्दबद्ध केलेल्या आठवणी सांगितल्या. आदित्य जाधव यांनी प्रास्ताविक केले. निवेदिका माहेश्वरी गोखरे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला खासदार धनंजय महाडिक, समरजितसिंह घाटगे, गुणीदास फाऊंडेशनचे राजप्रसाद धर्माधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. राजसी सप्रे यांनी आभार मानले.

…………

पप्पांची जिंदगी बडी, ते जीवनावर प्रचंड प्रेम करायचे

शिरीष सप्रे यांच्या कन्या राजसी सप्रे यांच्या मनोगतावेळी  सभागृह हेलावले. त्या म्हणाल्या, ‘पप्पा शिरीष सप्रे म्हणजे उत्साहाचा झरा होते. त्यांचे जीवनावर प्रचंड प्रेम होते. आयुष्यावर प्रेम करणारे, इतरांना आनंदी ठेवणारे हे व्यक्तिमत्व. आनंद सिनेमात एक संवाद आहे, ‘जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नही !’ हा संवाद माझ्या पप्पांना तंतोतंत लागू होतो. त्यांनी ज्या ज्या क्षेत्रात काम केले ते कार्य पुढे ठेवण्यासाठी शिरीष सप्रे फांडेशनची स्थापना करत आहे.’

..............................................

कलाप्रेमींना अनोखी पर्वणी

पुस्तक प्रकाशन सोहळयानंतर ‘राकेश अँड फ्रेंडस’हा सांगितीक कार्यक्रम झाला. भारतीय शास्त्रीय संगीत आणि जागतिक संगीताची कल्पक, प्रभावी गुंफण असलेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. बासरीवादक राकेश चौरासिया व त्यांच्या सहकारी कलाकार वादकांच्या ग्रुपचा हा सांगितीक कार्यक्रम जणू मनोरंजनाची मेजवाणी ठरली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes