महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : " विधानसभेच्या 2019 मधील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला सव्वाशे जागा दिल्या होत्या. भारतीय जनता पक्षाचे नेते हे तेव्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करायला मातोश्रीवर जात. त्यांचा सन्मान ठेवत. आता महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांना शंभर जागाही मिळत नाहीत. ते दिल्लीला गेले तर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी भेटत नाहीत. आता उद्धव ठाकरे यांचा आत्मसन्मान, स्वाभिमान कुठे गेला ? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला.
उपाध्ये हे शुक्रवारी 18 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर होते. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे लोकांच्याकडून सूचना मागून वचननामा तयार करण्यात येत आहे. विविध स्तरावरून सूचना मागवण्यासाठी प्रदेश भाजपच्या वचननामा समितीने सुमारे दहा हजार पेक्षा जास्त पत्रे राज्यभर पाठवले आहेत. नागरिकांच्या सूचना विचारात घेऊन भाजपतर्फे वचननामा तयार करण्यात येणार आहे .भाजपचा वचननामा म्हणजे रयतेचा रयतेसाठी असलेला वचननामा असणार आहे. यामध्ये सर्वंकष, सर्व समाजासाठीचे प्रतिबिंब उमटलेले दिसेल असेही उपाध्ये यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले. ज्या समाजातून आपण निवडून येतो त्या समाजासाठी उत्तरदायित्व म्हणून काम करण्याची भाजपची भूमिका आहे. महायुतीचे सगळे उमेदवार निवडून यावेत म्हणून प्रत्येक मतदारसंघात भाजपचा कार्यकर्ता हा मनापासून काम करेल. महायुतीने जो उमेदवार दिला आहे, तो भाजपचा उमेदवार आहे या विचाराने भाजपाचे कार्यकर्ते निवडणुकीत सक्रिय असतील. असेही उपाध्ये यांनी सांगितले.
महाविकास आघाडीतील जागा वाटपावर बोलताना उपाध्ये आणि उद्धव ठाकरे यांना उद्देशून सवाल केले. भाजपकडून शिवसेनेला 2019 च्या निवडणुकीत सव्वाशे जागा दिल्या होत्या. आता महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला शंभर जागाही मिळत नाहीत महाविकास आघाडीत त्यांनी केलेल्या मागण्यांना किंमत नाही. मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरत नाही. आता.त्यांचा आत्मसन्मान आणि स्वाभिमान कोठे गेला ? असा प्रश्न उपाध्ये यांनी उपस्थित केला.
पत्रकार परिषदेला भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, प्रदेश कार्यकारणी सदस्य राहुल चिकोडे, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, विजय जाधव, विजय अग्रवाल आदी उपस्थित होते