महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील सरवडे-मांगेवाडी दरम्यान ट्रक आणि बोलेरोची धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये तीन युवक ठार झाले. अपघातात मृत्यूमुखी पडलेले शुभम चंद्रकांत धावरे (वय २८वर्षे), आकाश आनंदा परीट (वय २३ वर्षे) आणि रोहन संभाजी लोहार ( २४ वर्षे) तिघेही तरुण सोळांकूर येथील आहेत. अपघातात गावातील तीन तरुणांचा मृत्यू झाल्यामुळे सोळांकूर गावावर शोककळा पसरली आहे.
या अपघातामध्ये चौघे गंभीर जखमी आहेत. जखमींमध्ये ऋत्विक राजेंद्र पाटील, भरत धनाजी पाटील, सौरभ सुरेश तेली आणि संभाजी लोहार यांचा समावेश आहे.बुधवारी, मध्यरात्रीच्या सुमारास सरवडे येथील नदीच्या पुलावर हा अपघात झाला. अपघाताची राधानगरी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. ट्रक चालकाविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
सोळांकूरमधील सहा जण कामाानिमित्त दुपारी गारगोटीला गेले होते. सगळेजण काम संपल्यानंतर रात्री उशिरा गावाकडे परत येत होते. सरवडे-मांगेवाडी मार्गावर एका हॉटेलजवळ ट्रकने बोलेरोला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तीघे जण जागीच ठार झाले. बोलेरो गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर ट्रकचालक ट्रकसह फरार झाला. दरम्यान पहाटेच्या सुमारास इस्पुर्ली येथे नागरिकांनी त्या ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती आहे.