महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राजकारणात स्वतंत्र ओळख व ताकत निर्माण केलेला जनसुराज्य शक्ती पक्ष विधानसभा २०२४ मधील निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात तीन जागा लढणार असल्याचे स्पष्ट झाले. मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक व आमदार विनय कोरे यांची बैठक झाली. या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यात जनसुराज्य शक्ती पक्ष तीन जागा लढणार असल्याचे स्पष्ट झाले. येत्या दोन दिवसात जनसुराज्याकडून यासंबंधी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
आमदार कोरे हे शाहूवाडी-विधानसभा मतदारसंघातून लढणार आहेत. हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोकराव माने यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर करवीर विधानसभा मतदारसंघातून संताजी घोरपडे हे मैदानात उतरणार आहेत. करवीरमध्ये महायुतीकडून माजी आमदार चंद्रदीप नरके यांची उमेदवारी निश्वित असल्यामुळे जनसुराज्य आणि महायुतीमध्ये येथे मैत्रीपूर्ण लढत होण्याची चिन्हे आहेत.
कोरे हे २०१९ च्या निवडणुकीपासून भाजप आघाडीसोबत आहेत. लोकसभा आणि व विधानसभा निवडणुकीत ते महायुतीसोबत आहेत. शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांची सहकार, राजकारणातील वजनदार व्यक्तिमत्व म्हणून ओळख आहे. या मतदारसंघात त्यांची लढत शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील यांच्याविरोधात होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडून अद्याप उमेदवारीची घोषणा नाही. मात्र माजी आमदार सत्यजित पाटील हेच ठाकरे गटाकडून मैदानात असतील अशी शक्यता आहे.
हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची म्हणून अशोकराव माने हे मतदारसंघात सक्रिय आहेत. त्यांचाही समाजकारण, सहकार, राजकारणात सहभाग आहे. उद्योग क्षेत्राशी ते निगडीत आहेत. सूतगिरणी व इंडस्ट्रीज क्षेत्रात आहेत. जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले आहे. हातकणंगले विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून विद्यमान आमदार राजू जयवंतराव आवळे यांची उमेदवारी निश्चित आहे. महाविकास आघाडीतंर्गत शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सुजित मिणचेकर ही येथे इच्छुक आहेत. मात्र महाविकास आघाडी फॉर्म्युलातंर्गत हा मतदारसंघ काँग्रेसला मिळणार आहे. यामुळे या ठिकाणी सध्या तरी माने विरुद्ध आवळे अशी लढत दिसत आहे.
करवीर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. नरके हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आहेत. यामुळे या मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्षाची उमेदवारी कोणाला फायदेशीर आणि कोणाला मारक ठरणार हे निकालानंतर स्पष्ट होईल. करवीरमधून काँग्रेसकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे. त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. शिवसेनेचे नरके यांनीही मतदारसंघात संपर्क दौरे काढले आहेत. जनसुराज्यचे घोरपडे हे विविध माध्यमातून लोकसंपर्कात आहेत.