शिक्षक बँकेतील सत्ताधारी पदाधिकाऱ्यांचा मागील संचालक मंडळावर आरोप
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : दि प्राथमिक शिक्षक बँकेतील जुन्या सत्ताधारी मंडळींनी रिझर्व्ह बँकेचे निर्देश व इतर सर्व नियम डावलत, योग्य त्या तरतुदी न करता २०२१-२२ या आर्थिक वर्षात दोन कोटी ३८ लाख रुपयांचा जो नफा दाखविला आहे तो केवळ कागदोपत्री आहे. जुन्या संचालकांच्या चुकीच्या कारभारामुळे सभासदांना लाभांश देण्याइतकीही शिल्लकी नाही. बँकेची सध्य स्थिती पाहिली असता बँक कोटयवधी रुपयांनी तोटयात असल्याचे समोर येत आहे’असा थेट आरोप शिक्षक बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील, व्हाइस चेअरमन पद्मजा मेढे व संचालक मंडळाने यापूर्वीच्या संचालक मंडळावर केला.
शिक्षक बँकेचे माजी चेअरमन राजाराम वरुटे यांच्या नेतृत्वाखाली बँकेत गेल्या तेरा वर्षात जे प्रकार घडले, जो चुकीचा कारभार झाला आहे त्याची चौकशी करण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना केली आहे. चौकशी पूर्ण होताच वरुटे यांच्या कारभारासंबंधी श्वेतपत्रिका प्रसिद्ध करू असेही सध्याच्या सत्ताधारी मंडळींनी सांगितले. दि प्राथमिक शिक्षक बँकेची ८४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी, १८ सप्टेंबर रोजीआहे. वार्षिक सर्वसाधारण सभेअगोदर पत्रकार परिषद घेत सत्ताधारी आघाडीने शिक्षक बँकेच्या निवडणुकीत सभासदांना जी आश्वासने दिली ती पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहेत असे सांगितले.
‘मागील संचालक मंडळाने निवडणूक डोळयासमोर कागदोपत्री नफा दाखविला. कोणत्याही तरतुदी केल्या नाहीत. मागील संचालक मंडळाने काही जुन्या रकमांचा जमाखर्च केला नाही असे शेरे लेखापरीक्षकांनी अहवालात मारले आहेत. दोन कोटी ३८ लाख इतका नफा दाखविल्यामुळे बँकेला ४५ लाख इनकम टॅक्स भरावा लागत आहे, त्यासंबंधी तरतूद केली नाही. मात्र नफा दाखविल्यामुळे यासंदर्भात वैधानिक लेखा परीक्षक व रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार आता त्या रकमेसाठी तरतुदी करणे आवश्यक असल्याने आमच्या संचालक मंडळाने त्या तरतुदी केल्या. त्यामुळे यंदा सभासदांना लाभांश देता येत नाही. भविष्यात काटकसरीचा कारभार करुन सभासदांना जास्तीत जास्त लाभ देण्याचा आमचा प्रयत्न राहील. वर्षाअखेर बँकेचा एकूण व्यवसाय हा ६३९ कोटी ५२ लाख इतका झाला आहे. ”असे चेअरमन पाटील यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला संचालक एस. व्ही. पाटील, सुनील एडके, अमर वरुटे, धनाजी रावण, वर्षा केनवडे, बाळासाहेब निंबाळकर, राजेंद्रकुमार पाटील, शिवाजी रोडे पाटील, शिवाजी बोलके, बाळकृष्ण हळदकर, बाबू परीट, नंदकुमार वाईंगडे, गजानन कांबळे, रामदास झेंडे, गौतम वर्धन, सुरेश कोळी, सुरेश सोनगेकर आदी उपस्थित होते.