छत्रपतींच्याविषयी राहुल सोलापूरकरांची मुक्ताफळे! इतिहास अभ्यासक, राजकारण्यांकडून खरपूस समाचार !!
schedule04 Feb 25 person by visibility 306 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अभिनेता राहूल सोलापूरकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. इतिहास अभ्यासक, राजकारणी, शिवप्रेमींतून सोलापूरकरांचा निषेधही करण्यात आला. तसेच त्यांच्यावर शाब्दिक तोफाही डागल्या. राहुल सोलापूरकरांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी आक्रमक भूमिका अनेकांनी मांडली.
अभिनेता सोलापूरकर यांनी नुकतेच, ‘छत्रपती शिवाजी महाराज आग्य्राहून सुटले त्यावेळी पेटारे-बेटारे काही नव्हते. चक्क लाच देऊन महाराज आलेत. त्यासाठी किती हुंडया वठविल्या त्याचेही पुरावे आहेत. महाराजांनी, औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोलाही लाच दिली होती.’ असे विधान केले आहे. शिवाय हिरकणीचा इतिहास घडलेला नाही. रंजकता आणण्यासाठी अशा गोष्टी लिहिल्या आहेत.’अशी मुक्ताफळे उधळली होती. त्यांच्या या विधानाचा समाजातील वेगवेगळया घटकाकडून समाचार घेतला जात आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोलापूरकरचा समाचार घेताना म्हटले आहे, ‘हिरकणी झालीच नव्हती. हिरकणी नावाचे व्यक्तिमत्व अस्तित्वात नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज हे आग्य्राहून लाच देऊन निघाले अशा पद्धतीने इतिहासाचे विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख ? हा मूर्ख माणूस सध्या महाराष्ट्राला इतिहासाचे डोस पाजतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची इंची कमी करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न अशा माणसाकडून केला जातोय याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. या महामुर्खाने आपल्या तोंडाला टाळे लावावे. शिवप्रेमी हे फार सहन करणार नाहीत. अन् हिरकणी बुरुज कुठे आहे हे याला रायगडावर नेऊन दाखवावे लागेल.’
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोलापूरकर यांचा समाचार घेतला आहे. मिटकरी म्हणाले, ‘राहुल सोलापूरकर हा चित्रपटात जसा हैवान आहे, तसा वैयक्तिक जीवनातही किती हैवान असू शकतो हे त्यानं केलेल्या चुकीच्या भाष्यावरुन जाणवते.छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास हा गंमतीने नव्हे तर गांभीर्याने घेण्याची गरज आहे. छत्रपती शिवराय यांच्याविषयी चुकीचे विधान करणाऱ्या सोलापूरकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असेही मिटकरी यांनी म्हटले आहे.
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत म्हणाले, ‘छत्रपती शिवरायांनी आग्य्राहून सुटताना लाच दिली अशी कुठेही नोंद नाही. महाराजांची आग्य्राहून सुटका ही इतिहासातील महान, आणि महाराजांच्या पराक्रमाची कथा आहे. राहुल सोलापूरकरांनी केलेले विधान चुकीचे आहे. त्यांनी यापूर्वी मनुस्मृतीचं समर्थन करणारी विधाने केली आहेत. महापुरुषांच्या भूमिका साकारणं आणि इतिहासाचं अभ्यास असणे या दोन वेगळया गोष्टी आहेत. सोलापूरकरांनी गमंत म्हणून चुकीचा इतिहास सांगणं थांबावले पाहिजे. गमंत म्हणून कोणी काय बोलत असेल तर महाराष्ट्रानं काय करावं हे नव्याने सांगण्याची गरज नाही. सोलापूरकर यांनी महाराष्ट्राची माफी मागावी.’
अभिनेता किरण माने यांनी सोलापूरकरवर निशाणा साधला आहे. मानेंनी म्हटले आहे, ‘असल्या टुकारांना शाहु महाराजांच्या भुमिका दिल्या गेल्या, तरी यांच्या मेंदूतलं शेण तसंच आहे. विनोद म्हणजे शिवरायांची बदनामी करण्याच्या नादात स्वत:ला शिवशाहीर म्हणवून घेणार्या एका इतिहासद्रोह्यालाही याने खोटे ठरवले. अरे, 'लाच' दिली होती का नव्हती हे दूरच... पण लाच दिल्याचे कधी पुरावे असतात का??? कडेकोट बंदोबस्तात तुरूंगात असताना महाराज पैसे चारतात आणि त्यांना ‘लाच दिली’ असे अधिकृत शिक्क्याचे परवाने मिळतात, असा अनागोंदी कारभार चालायला ते इव्हिएम घोटाळ्यानं सत्तेत आलेलं सरकार होतं की काय???’