शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शनिवारी पंढरपूरमध्ये सद्बुद्धी दिंडी यात्रा , बाधित शेतकऱ्यांची होणार सभा
schedule17 Jul 26 person by visibility 32 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा लढा आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. राज्य सरकारने अद्याप हा विनाशकारी प्रकल्प अधिकृतपणे आणि पूर्णपणे रद्द करण्याची घोषणा न केल्याने, राज्यातील १३ जिल्ह्यांतील बाधित शेतकरी विठूरायाच्या दारी न्याय मागण्यासाठी एकत्र येत आहेत. या पार्श्वभूमीवर, शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने शनिवार, १८ जुलै रोजी पंढरपूर येथे आयोजित 'सद्बुद्धी दिंडी यात्रे'च्या पूर्वतयारीसाठी आणि नियोजनासाठी कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे महत्त्वाची सर्वपक्षीय बैठक झाली. शेतकरी संघर्ष समितीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी माहिती दिली.
या सर्वपक्षीय बैठकीला कोल्हापूर जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, कष्टकरी आणि मोठ्या संख्येने महामार्गबाधित शेतकरी उपस्थित होते. या आंदोलनात कोल्हापूर जिल्ह्यातून हजारो शेतकरी पूर्ण ताकदीनिशी उतरणार असून, १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पंढरपूर येथील ऐतिहासिक वाखरी मैदान येथे पोहोचणार आहेत, असा एकमुखी निर्णय या बैठकीत घेण्यात आला. आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात येणार आहेत. याच काळात राज्यातील १३ जिल्ह्यांतील हजारो बाधित शेतकरी पंढरपुरात विठ्ठलाच्या चरणी एकत्र येतील. १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पंढरपूर येथील राज पॅलेस इसबावी येथे सर्व बाधित शेतकऱ्यांची जाहीर सभा होईल. सभेनंतर वाखरी ते विठ्ठल मंदिर अशी हजारो शेतकऱ्यांची पायी 'सद्बुद्धी दिंडी यात्रा' (मोर्चा) काढण्यात येईल.
पंढरपूर येथील या ऐतिहासिक सद्बुद्धी दिंडी यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील, विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार कैलास पाटील, कॉम्रेड गिरीश फोंडे सहभागी होणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, कागल, हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, आजरा, गडहिंग्लज आणि चंदगड या सर्वच तालुक्यांतील शेतकरी खाजगी वाहने, बसेस आणि रेल्वेने १८ जुलै रोजी पहाटेच पंढरपूरकडे रवाना होतील. बैठकीस कॅा.गिरीश फोंडे , विजय देवणे , प्रभाकर नारकर, पी डी धुंदरे , मा. जि. उपाध्यक्ष हिंदुराव चौगुले , शिवाजी सिद , प्रकाश पाटील यांचेसह सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.