सर्वसाधारण सभेशिवाय निवडणूक खर्चाला मान्यता कोण देणार ? तेरापैकी आठ संचालक भोसलेंच्या विरोधात, त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :”‘अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सध्याच्या कार्यकारिणीतील तेरापैकी आठ संचालकांनी एकत्र येत अध्यक्षपदी माझी निवड केली. एकीकडे आठ संचालक आणि दुसऱ्या बाजूला मेघराज भोसले व तीन संचालक अशी स्थिती असताना ते स्वत:ला अजूनही कोणत्या आधारावर महामंडळाचे अध्यक्ष म्हणवून घेतात ? कोणतेही अधिकार नसताना मेघराज भोसले यांनी निवडणूक घेण्याविषयी जो कार्यक्रम घोषित केला, त्या घोषणेला महामंडळाच्या घटनेचा कसलाही आधार नाही. भोसले यांची निवडणुकीसंबंधींची घोषणा बेसलेस आहे.” असा प्रतिटोला चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष सुशांत शेलार यांनी मेघराजराजे भोसले यांना लगाविला आहे.
मेघराज भोसले यांनी बुधवारी, (ता.१४ सप्टेंबर) कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. महामंडळाचा अध्यक्ष मीच आहे असा दावा करत भोसले यांनी चित्रपट महामंडळाच्या निवडणूक घेण्यासाठी निवडणूक समिती स्थापन केली. निवडणूक समितीने, महामंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यावरुन महामंडळात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मेघराजराजे भोसले यांनी, महामंडळाच्या आगामी निवडणुकीत सुशांत शेलार, धनाजी यमकर व रणजित जाधव यांचे डिपॉझिट जप्त करु असा इशारा दिला आहे. शिवाय तीन महिन्यापूर्वी महामंडळाच्या अध्यक्षपदी सुशांत शेलार यांची झालेली निवड घटनाबाह्य असल्याचे म्हटले.
यासंबंधी सुशांत शेलार यांच्याशी संपर्क साधला. भोसले यांनी जे आरोप केले आहेत त्यांना कोणाताही बेस नाही असे स्पष्टपणे शेलार यांनी सांगितले. शेलार म्हणाले, ‘महामंडळाच्या एकूण संचालकांची संख्या चौदा इतकी आहे. त्यापैकी एक संचालक मयत आहेत. उर्वरित तेरापैकी आठ संचालक एकत्र आले. त्यांनी तीन महिन्यापूर्वी महामंडळाच्या अध्यक्षपदी माझी निवड केली. आठ संचालक एका बाजूला आणि चार संचालक भोसले यांच्या बाजूने राहिले. मग ते स्वत:ला महामंडळाचे अध्यक्ष कसे म्हणवून घेतात.”
“निवडणुकीत सभासद निर्णय घेत असतात. जय-पराजयाचा कौल सभासद देतात. माझे डिपॉझिट जप्त करणार असे मेघराज भोसले कोणत्या आधारावर म्हणतात ? कार्यकारिणीची बैठक नाही. महामंडळाची सर्वसाधारण सभा नाही, मग निवडणुकीच्या खर्चाला मंजुरी कोण देणार ? सभासद सूज्ञ आहेत. भोसले यांच्या विधानाला फार महत्व देण्यात अर्थ नाही. भोसले यांनी आत्मपरीक्षण करायची गरज आहे. इतर संचालक आपणाला का सोडून गेले हे त्यांनी एकदा स्वत:ला विचारावे. त्यांची आणि वैयक्तिक दुश्मनी नाही. पण सध्या ते जे काही करत आहेत त्याला कोणताही बेस नाही. घटनेचा आधार नाही. ”असेही शेलार यांनी स्पष्ट केले.