देशभरातील उद्योग जगतासाठी केआयटीच्या अभियंत्यांनी योगदान द्यावे - सचिन मेनन
schedule04 Jul 25 person by visibility 80 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ संस्थापक संचालकांनी एक मोठा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवत केआयटी कॉलेजची स्थापना केली आहे तो त्यांचा हेतू सफल होत असल्याबद्दल समाधान वाटत आहे. राष्ट्रीय व सामाजिक हित बाळगून अभियंत्यांना घडवणाऱ्या अशा आपल्या संस्थेसाठी आपण सर्व सक्रीय व कार्यतत्पर राहू. भारतातील स्थानिक उद्योग जगतासाठी केआयटीच्या अभियंत्याने योगदान दिले पाहिजे. प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाबाबत सजग केले पाहिजे.’ असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष सचिन मेनन यांनी केले.
पश्चिम महाराष्ट्रातील अभियांत्रिकी शिक्षणातील दीपस्तंभ ठरलेल्या कोल्हापूर येथील केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयाचा ४३ वा स्थापना दिवस शुक्रवारी (४ जुलै २०२५) उत्साहात साजरा करण्यात आला. अभियांत्रिकी बरोबरच व्यावसायिक अभ्यासक्रमातील पदव्युत्तर शिक्षणातही केआयटीने स्वतःचा वेगळा ठसा उमटवलेला आहे.हजारो क्षमतावान अभियंते, शेकडो उद्योजक, शास्त्रज्ञ, प्रशासकीय अधिकारी, सैन्य अधिकारी, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणारी संस्था म्हणून केआयटी कडे पाहिले जाते. समाजाचा ‘विश्वास’ देखील या संस्थेने आपल्या सतत राखलेल्या शैक्षणिक गुणवत्तेने संपादित केलेला आहे असे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले.
संस्थेचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी म्हणाले, ‘सध्याच्या औद्योगिक क्षेत्रातील स्पर्धात्मक युगामध्ये केआयटी दर्जात्मक शिक्षणाचा आग्रह ठेवून आधुनिकतेची कास धरत वाटचाल करीत आहे.सर्वप्रकारची मानांकने मिळवणाऱ्या या संस्थेला प्रदत्त स्वायत्ततेचा दर्जा ही प्राप्त झालेला आहे. केआयटीने आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यापीठांशी करार करून येथील विद्यार्थ्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यापीठांमध्ये काम करण्याची थेट उपलब्ध केली आहे.” यावेळी संस्थेचे सचिव दीपक चौगुले, विश्वस्त सुनील कुलकर्णी, दिलीप जोशी यांची भाषणे झाली.संस्थेतील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. सुजय खाडीलकर, डॉ.उमा गुरव, सुधीर अरळी, डॉ. मंदार सोनटक्के डॉ. वाय.एम.पाटील यांनी केआयटी बद्दल कृतज्ञता मनोगतातून व्यक्त केली. प्रा. डॉ.दिपाली जाधव यांनी स्वागत केले. अधिष्ठाता,शिक्षण विभाग डॉ. अक्षय थोरवत यांनी प्रास्ताविक केले. प्रा. ऋतूपर्ण करकरे यांनी आभार मानले.