महायुतीकडून राज्यातील जनतेला न्याय, दोन वर्षात महाराष्ट्रात आठ लाख कोटीची गुंतवणूक ! राजेश क्षीरसागर
schedule18 Oct 24 person by visibility 97
categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यातील जनतेला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. राज्याचा सर्वंकष विकास हे सूत्र डोळयासमोर ठेवून सरकार काम करत आहे. विकासाच्या पातळीवर राज्य नेहमी अग्रस्थानी राहावे यासाठी सरकार कटिबद्ध आहे. गेल्या दोन-अडीच वर्षात महाराष्ट्रात आठ लाख कोटीची गुंतवणूक झाली. लोकाभिमुख योजना आणि विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी संबंधी रिपोर्ट कार्ड लोकांच्या हाती देणारे हे पहिलेच सरकार आहे. विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतील साथ द्यावी’असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले.
‘महायुती –काम हीच ओळख’ या नावांनी सरकारच्या विविध लोकल्याणकारी योजनांची व कामकाजाची माहितीयुक्त ‘रिपोर्ट कार्ड २०२२-२४’ प्रकाशित केले आहे. यासंबंधी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत क्षीरसागर बोलत होते. नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर, शिवसेना जिल्हाध्यक्ष सुजित चव्हाण, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, शिवसेनेचे शिवाजी जाधव, किशोर घाटगे, उदय भोसले, रणजीत साळोखे, राष्ट्रवादीचे उत्तम कोराणे आदींच्या उपस्थितीतमध्ये रिपोर्ट कार्ड प्रकाशित केले.
भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव म्हणाले, ‘ राज्यातील जनता महायुती सरकारला पुन्हा निवडून देईल.महायुतीच सगळे कार्यकर्ते महायुती सरकार सत्तेवर आणण्यासाठी जीवापाड प्रयत्न करतील. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळेल. विरोधकांकडे उमेदवारांची वानवा आहे.’ पत्रकार परिषदेला शिवसेनेचे निलेश हंकारे, महिला आघाडीच्या मंगल साळोखे, पूजा भोर, भाजपाच्य गायत्री राऊत आदी उपस्थित होत्या.
……………………………………….
महायुतीतील सगळे घटक पक्ष मनाने एक
पत्रकार परिषदेत राजेश क्षीरसागर यांनी महायुती सरकारच्या विकासकामांचा आलेख मांडला. राज्यातील सरकार हे संयमी आहे. ‘जनतेला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. महिलांना एसटी प्रवासात सवलत, लाडकी बहिण योजना, मुलींना उच्च शिक्षण मोफत, ज्येष्ठ नागरिकांना सुविधा, युवकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम, कृषी पंप वीज बिल माफ असे विविध निर्णय घेत सरकारने लोकाभिमुख कामकाज केले आहे. विधानसभा निवडणुकीत वरिष्ठ जो आदेश देतील तो आम्हाला मान्य आहे. महायुतीतील सगळे घटक पक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मनाने एक आहेत. कोणतेही रुसवे फुगवे नाहीत.’असे क्षीरसागर यांनी सांगितले.