महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावात बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या बिलापोटी तक्रारदाराकडे तीस हजार रुपयाची लाच स्वीकारताना ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून जाळ्यात पकडले. लाच घेणारा करवीर तालुक्यातील कुर्डू गावचा ग्रामसेवक महादेव गणपती डोंगळे, (वय 56 वर्षे,रा. घोटवडे, ता. राधानगरी), ग्रामपंचायत सदस्य धनाजी मारुती पाटील, (वय 47, रा. कुर्डु, ता. करवीर) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी या कारवाईची माहिती दिली. या गुन्ह्यातील तक्रारदार यांनी कुर्डु गावी स्वच्छ भारत अभियानांतर्गत सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम केले होते. त्याचे बिल एकूण 2,99,000 मंजूर करून त्यापैकी 1,97,000/- रु. खात्यावर वर्ग केली. उर्वरित बिलाची रक्कम खात्यावर वर्ग करणेसाठी ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील यांनी स्वतः सह, ग्रामसेवक डोंगळे व इतर यांच्यासाठी बिलाचे 10% प्रमाणे 30 हजार रुपये लाचेची मागणी केली. तसेच ग्रामसेवक डोंगळे यांनी पाटील यांचे मागणीस दुजोरा देऊन त्यांच्यासाठीची दोन टक्के प्रमाणे सहा हजार रुपयांची लाच रक्कम स्वतःकडेच देण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पोलिसांनी 28 सप्टेंबर रोजी लाच मागितलेल्या तक्रारीची पडताळणी केली आणि त्यानंतर सापळा रचला. ग्रामसेवक डोंगळे याने वाशी येथे लाचेची रक्कम घेऊन येण्यास सांगितले. तिथे पाच हजाराची लाच स्वीकारताना पोलिसांनी रंगेहात पकडले. तर ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील याला करवीर तालुक्यातील हळदी गावात 25 हजार रुपयाची लाच घेताना जाळ्यात पकडले
पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत यांचे नेतृत्वाखाली पोलिस हेडकॉस्टेंबल शरद पोरे, विकास माने, मयूर देसाई, रुपेश माने, सूरज अपराध यांनी कारवाईत भाग घेतला.