शेतकऱ्यांची मुंबईत धडक ! आझाद मैदान गरजला एकच जिद्द-शक्तीपीठ रद्द !!
schedule12 Mar 25 person by visibility 219 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ शेती वाचवा-देश वाचवा, शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, एकच जिद्द-शक्तीपीठ रद्द’ या घोषणांनी मुंबईतील आझाद मैदान गरजला. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात बाधित बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मुंबईत धडक मोर्चाचे आयोजन केले होते. आझाद मैदान ते विधानभवन मोर्चा निघण्यापूर्वी सभा झाली. या सभेच्या निमित्ताने, शक्तीपीठ विरोधात आझाद मैदानावर सर्व शेतकऱ्यांची एकजूट दिसून आली. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांच्या पुढाकारातून धडक मोर्चाचे आयोजन केले आहे.
हजारो शेतकरी, शेतमजुरांच्या उपस्थितीत ही सभा झाली. अनेक संघटनांनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत आसगावकर, सचिन अहिर यांनी आदोलनामध्ये सहभागी होऊन पाठींबा दर्शविला आहे.
‘चाळीस हजार एकर शेती नष्ट करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे,शेतकऱ्यांच्यावर अन्याय रद्द झालाच पाहिजे, महाराष्ट्र सरकार कोमात-कंत्राटदार जोमात, पर्यावरण उद्धवस्त करणारा शक्तीपीट महामार्ग होऊ देणार नाही’या मजकुराचे फलक घेऊन शेतकरी आंदोलनात उतरले. सकाळी दहा वाजताच शेतकरी आझाद मैदान येथे पोहोचले. शक्तीपीठ विरोधी घोषणा आणि फलक हाती घेऊन शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला.
आंदोलनात कोल्हापुरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. माजी आमदार संजय घाटगे, के.पी. पाटील, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, निमंत्रक गिरीश फोंडे, काँग्रेसचे राहुल देसाई, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जीवन पाटील, एकनाथ पाटील, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, राजेंद्र मोरे, करवीर पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप झांबरे, सागर पाटील, आनंदा बनकर, बाजार समितीचे सुयोग वाडकर, युवराज गवळी यांच्यासह शेतकरी मोठया संख्येने सहभागी आहेत.