महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या आवारात सध्या चारचाकी वाहनांची गर्दी वाढत आहे. खासगी वाहने जिल्हा परिषदेच्या आवारात मनाई असताना देखील वाहनधारक मात्र सुरक्षा कर्मचाऱ्यांना जुमानत नसल्याचे चित्र आहे. वाहन पार्किंगसाठी कागलकर हाऊस इमारतीच्या बाजूला वाहनतळ असताना वाहनधारक मात्र जिल्हा परिषदेच्या आतील प्रवेशद्वारापर्यंत चारचाकी वाहने नेते आहेत. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अडविण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यासोबत वाहनचालक व मालक हुज्जत घालत आहेत. चारचाकीवाल्यांच्या आडमुठया भूमिकेला ब्रेक लावण्याची गरज आहे अशा भावना नागरिकांच्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या विविध योजनेसाठी दररोज शेकडो नागरिक ये जा करत असतात. नागरिकांच्या सोयीसाठी सगळी कार्यालये एकाच इमारतीत आहेत. यामुळे दिवसभर वर्दळ असते. वास्तविक खासगी वाहनांना जिल्हा परिषदेच्या आवारात मनाई आहे. मात्र चारचाकीवाले बिनधास्त हा नियम तोडत जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या प्रवेशद्वारापर्यंत वाहने नेतात. इमारतीसमोर वाहने पार्क करतात. यामुळे या परिसरात वाहनांची गर्दी नित्याची झाली आहे. तासनतास ही वाहने जिल्हा परिषदेच्या आवारात थांबलेली दिसतात. पार्किंगसाठी कागलकर हाऊसच्या परिसरात जागा आहे. लाखो रुपये खर्चून वाहनतळ केले आहे. मात्र साऱ्यांनाच जिल्हा परिषदेच्या आवारात वाहन आणणे, त्या ठिकाणी पार्क करणे मोठेपणाचे वाटते की काय अशी शंका येऊ लागली आहे.
अधिकाऱ्यांनीच पुढाकार घेण्याची गरज
या वाहनधारकांना अडविण्याचा प्रयत्न सुरक्षा कर्मचाऱ्यांनी केला तर त्यांच्याशी हुज्जत घातली जात आहे. हे प्रकार थांबविण्यासाठी आता अधिकाऱ्यांनीच पुढाकार घ्यायची गरज आहे. बाहेरील प्रवेशद्वार ते इमारत हे अंतर फार नाही. मात्र चार पावलं ही चालायला नको. जिल्हा परिषदेच्या दारात चारचाकी लावणार या आडमुडया भूमिकेला ब्रेक बसवावा. यामुळे हा परिसर मोकळा राहिल. नागरिकांना ये जा करताना कोणताही त्रास होणार नाही अशी नागरिकांची मागणी आहे.
……………………….
यशवंतराव चव्हाण स्मारकासमोरही वाहने
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक जिल्हा परिषदेच्या परिसरात आहे. इमारतीच्या एका बाजूला पूर्णाकृती पुतळा आहे. मात्र स्मारकासमोरच चारचाकी वाहने लावली जातात. स्मारकाचे दर्शन घेणाऱ्या नागरिकांना या वाहनांची गर्दीतून वाट काढत जावे लागते. जिल्हा परिषदेच्या आवारात खासगी वाहने नकोत. तसेच अधिकाऱ्यांची वाहने ही वाहनतळावरच पार्क करावीत. तरच जिल्हा परिषदेचा परिसर वाहन फ्री होईल.
……………….
शौमिका महाडिकांच्या कालावधीत होती शिस्त
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक यांच्या कालावधीत शिस्त होती. जिल्हा परिषद इमारतीच्या परिसरात एकही वाहन पार्क केले जात नसे. पदाधिकारी, अधिकारी व अन्य व्यक्तींची चारचाकी वाहने सुद्धा कागलकर हाऊस परिसरातील वाहनतळावरच पार्क केली जायची. त्या कालावधीत अधिकाऱ्यांनीही परिसरात या नियमावलींची कडक अंमलबजावणी केली होती. पदाधिकारी बदलला, नवीन अधिकारी आले की पूर्वी चालत आलेल्या चांगल्या गोष्टीही बाजूला पडतात त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे जिल्हा परिषद परिसरातील सध्याचे चित्र आहे.