महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर –पुणे या राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था आणि टोल आकारणीला विरोध करण्यासाठी काँग्रेसतर्फे तीन ऑगस्ट रोजी किणी टोल नाका येथे आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान बेकायदेशीररित्या राष्ट्रीय महामार्ग रोखणे व पोलिस अधिकाऱ्यांचा आदेश डावलला म्हणून काँग्रेसच्या २२ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिस काँन्स्टेबल योगेश राक्षे यांनी फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक विलास भोसले यांच्याकडे तपासाचे काम आहे.
गुन्हे नोंद झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये शिरोली येथील शशिकांत खवरे, सनी शिंदे, विक्रम खवरे, बाजीराव सातपुते, प्रशांत कांबळे, संजय पोवार-वाईकर, कसबा बावडा येथील मोहन सालपे, अजित धामोडकर, राकेश उलपे, भादोलेतील कपिल पाटील, शियेतील विश्वनाथ पाटील, नागाव येथील उत्तम सावंत, तानाजी सावंत, कोल्हापुरातील सुभाष जाधव, दुर्वास कदम, वाशीतील बबन रानगे, घुणकीतील शहाजी सिद, चावरेतील विलास आनंदा जाधव, सुरेंद्र विष्णू धोगडे, केर्लीतील संपत भोसले याचा समावेश आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील, आमदार राजू आवळे, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्याच्या बाजूला आंदोलन करत होते. आंदोलन सुरू असतानाच काही कार्यकर्ते राष्ट्रीय महामार्गावर उतरले. वाहतूक रोखून धरली. म्हणून २२ कार्यकर्त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.