महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कंत्राटदार व विकसकांनी केलेल्या विकासकामांची थकित बिले मिळावेत यासाठी कंत्राटदार रस्त्यावर उतरले. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, कोल्हापूर शाखा व राज्य अभियंता संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांना निवेदन दिले. तसेच विविध जलसंधारण, बांधकाम, जल जीवन मिशनच्या प्रमुख अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
‘कंत्राटदार आणि विकसकांनी केलेल्य विकास कामांची तब्बल ४० हजार कोटी रुपयांची बिले थकीत आहेत. थकीत बिले त्वरित मिळावेत. यापुढे सरकारी कामे मंजूर करताना शंभर टक्के तरतूद केल्याशिवाय मंजूर करू नयेत. राज्यातील सर्व विभागाकडील कामांची विभागणी सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मजूर संस्था व कंत्राटदारामध्ये ३३:३३:३४ अशी व्हावी व ग्रामविकास विभागाच्या कामाची विभागणी ४० २६ ३४ या पद्धतीने व्हावी. राज्यातील कंत्राटदार व विकसकांना सरकारी कामो करताना संरक्षण कायदा मंजूर करावा आदी मागण्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना दिले.
आंदोलनात कंत्राटदार महासंघाचे राज्य सचिव सुनील नागराळे, बापू लाड, बापू कोंडेकर, मंजू श्रेष्ठी, आर आर पाटील, सुरेश नलवडे, बी एस पाटील, संजय खोत यांच्यासह मोठया संख्येने कंत्राटदार सहभागी होते.