संमेलन शाहू कार्य संवर्धनाचे ! निर्धार शाहू विचारांची ‘झेन झी’पिढी घडविण्याचे ! !
schedule26 Jul 26 person by visibility 77 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांच्या विचार कार्याचा प्रसार आणि प्रचारासाठी कृतिशील कार्यक्रम ठरविण्यासाठी कोल्हापुरात रविवारी, (२६ जुलै २०२६) ‘राजर्षी शाहू कार्य संवर्धन संमेलन’ झाले. राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावर संशोधन व अभ्यास करणाऱ्या मंडळींमध्ये कोणी पुस्तक लिखाणाची संकल्पना मांडली. कुणी शाहू कार्यावर आधारित व्हिडिओ, रिल्स करण्याचा विषय मांडला. कुणी सोप्या भाषेत शाहू चरित्र साऱ्या लोकांपर्यत पोहोचविण्याची भूमिका मांडली. कुणी एकांकिका, नाटकाद्वारे शाहू कार्यावर फोकस करण्याविषयी सुचविले. तर कोण शालेय अभ्यासक्रमात प्रत्येक इयत्तेत शाहू कार्य समाविष्ठ करण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करण्याची सूचना केली. तब्बल अडीच तासाहून अधिक वेळ विचारमंथन झाले. राजर्षी शाहू कार्याचे संवर्धन करण्याचे ठरले. तसेच शाहू विचारांची ‘झेन झी’पिढी घडविण्यासाठी संयुक्त प्रयत्न करण्याचा निर्धारही केला.
श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या सभागृहात हे संमेलन झाले. राजर्षी शाहू सलोखा मंचतर्फे आयोजित संमेलनात ‘संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या खासगीकरणाला विरोध, राजर्षी शाहू स्मारक भवनमधील सभागृहाचे भाडे कमी झाले पाहिजे, सरकारने, दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथील राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा बदलून नवीन पुतळा बसविणे आणि शाहू स्मारक उभारावे’असे ठराव संमंत करण्यात आले. राजर्षी शाहू कार्याचे अभ्यासक डॉ. भाऊसाहेब खणे हे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे चेअरमन के. जी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंचचे निमंत्रक वसंतराव मुळीक यांनी संमेलन आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. राजर्षी शाहू महाराजांनी ५० टक्के आरक्षण लागू केलेल्या घटनेचे यंदा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त वर्षभर शाहू विचारकार्यासंबंधी कृतिशील उपक्रम राबविण्यासंदर्भात संमेलन आयोजित केले आहे. त्या अनुषंगाने प्रत्येकांनी सूचना कराव्यात’असे सांगितले. डॉ. रमेश जाधव यांनी, राजर्षी शाहू महाराज यांच्या कालावधीतील कायदे, आदेशासंबंधी पुस्तक निर्मितीची जबाबदारी नव अभ्यासकांनी घ्यावी अशी सूचना केली.
अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी शाहू विचारांची झेन झी पिढी घडविण्यासाठी साऱ्यांनी पुढाकार घेऊ या. दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील राजर्षी शाहू महाराज यांचा पुतळा बदलण्यासंबंधी पाठपुरावा करू या. सरकारने नवीन पुतळा बसविला नाही तर कोल्हापूरकर लोकवर्गणीतून पुतळा देतील’असे स्पष्ट केले. प्रा. डॉ. विलास पोवार यांनी, ‘शाहू विचार कार्याच्या प्रसार व प्रचारासंबंधी प्रत्येकानी जबाबदारी उचलावी’असे सुचविले. प्राचार्य टी. एस. पाटील यांनी, ‘शाहू विचार कार्याच्या प्रसारात स्थानिक स्वराज्य संस्थांना सामावून घेण्याची गरज आहे.’असे नमूद केले. नाटककार सुनील माने यांनी,एकांकिका व नाटकातून शाहू चरित्र अधिक लोकापर्यत पोहोचविण्यासाठी समाजघटकाच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. राम यादव यांनी खेळांना प्रोत्साहित करण्यासंबंधी तर प्रा. छाया पोवार, स्वप्नजा घाटगे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या महिला उन्नतीविषयक कार्यासंबंधी ऊहापोह केला. अभ्यासक डॉ. देविकाराणी पाटील यांनी, ‘राजर्षी शाहू महाराज यांच्याशी निगडीत वास्तू व पाऊलखुणा जपण्यासाठी साऱ्यांनी सजग हवे.’अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रा. डॉ. गिरीश मोरे यांनी, राजर्षी शाहू महाराजांच्या अनेकविध कार्याची महती सांगणारे दहा ते पंधरा मिनिटाचे १२५ व्हिडिओ तयार करण्याची संकल्पना मांडली. डॉ. कपिल राजहंस यांनी, ‘सामान्य लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत शाहू चरित्राची मांडणी पुस्तकरुपात व्हायला हवी.’असे सांगितले. लेखक उमेश सुर्यवंशी यांनी, ‘शाहू महाराज यांच्यासोबत ज्यांनी काम केले अशा १२५ कर्तबगारांच्यावर पुस्तिका प्रकाशित करायला हवेत. त्या पुस्तिकेच्या निर्मितीच जबाबदारी तालीम संस्थावर सोपवावी’असे सांगितले. गणेशकुमार खोडके यांनी शाहू चरित्र, कागदपत्रे यासंबंधी विवेचन केले. प्रा. डॉ. नंदकुमार मोरे यांनी, शाहू कार्याच्या प्रसाारातंर्गत शिक्षकांसाठी प्रशिक्षणे हवीत असा मुद्दा मांडला. प्रा. डॉ. शिवाजी जाधव यांनी डिजीटल साधनांचा वापर करुन शाहू कार्याचे संवर्धन करता येईल.’असे सांगितले. डॉ. संभाजी बिरांजे यांनी राजर्षी शाहू महाराज यांचे सर्वांगिण चरित्र प्रकाशित झाले पाहिजे यावर भर दिला. प्राचार्य डॉ. जे. के. पवार यांनी, ‘राजर्षी शाहू महाराज यांची आरक्षणविषयक भूमिका नव्या पिढीपर्यत पोहोचविली पाहिजे. जिल्हा परिषद, महापालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मदतीने शाहू कार्यावर पुस्तके प्रकाशित झाली पाहिजेत असे मत मांडले. प्रा. डॉ. प्रल्हाद माने, पत्रकार श्रीराम पचिंद्रे, चंद्रकांत पाटील, विक्रम रेपे, अमित अडसुळे, सुहास निंबाळकर यांनीही चर्चेत सहभाग घेतला. मंचचे सहनिमंत्रक बबनराव रानगे यांनी सूत्रसंचालन केले.