कोल्हापुरात काँक्रिटचे रस्ते, आयटी हबला प्राधान्य ! झोपडपट्टीवासियांना प्रॉपर्टी कार्ड, गरीबांना पक्की घरे !!
schedule09 Jan 26 person by visibility 209 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ जे मनात…तेच मनपात’ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून महायुतीने कोल्हापूर महापालिकेसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. पुढॅल वर्षे टिकतील इतक्या दर्जाचे काँक्रिटचे रस्ते, आयटी हबला प्राधान्य, लोकसहभागातून बागांचे सुशोभिकरण, कोल्हापूर केसरी कुस्ती स्पर्धा आणि संगीत महोत्सव सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच महायुतीच्या या जाहीरनाम्यात ‘झोपडपट्टीवासियांना प्रॉपर्टी कार्ड, गरीबांना पक्की घरे’याची हमी दिली आहे.
‘हा जाहीरनामा नव्हे तर कर्तव्यनामा आहे. केंद्रात, राज्यात महायुतीची सत्ता आहे. कोल्हापूरच्या विकासासाठी महापालिकेतही महायुती हवी. कोल्हापूरचा शाश्वत विकास करू’अशी ग्वाही महायुतीच्या नेते मंडळींनी दिली. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, माजी आमदार जयश्री जाधव, युथ आयकॉन कृष्णराज महाडिक, भाजपाचे प्रदेश सचिव महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय बलुगडे, शिवसेनेचे निवडणूक समन्वयक रत्नेश शिरोळकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध केला.
जाहीरनाम्यात महापालिकेची नवी इमारत, शहरात साठ ठिकाणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करणे, महापालिकेच्या आरक्षित जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी सेवा पुरविणे, घरफाळ आकारणीत सुटसुटीतपणाा,पंचगंगा स्वच्छता, महिलासाठी स्वच्छतागृह, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणे याबाबी समाविष्ठ आहेत. तसेच करवीर राज्य संस्थापिका महाराणी ताराराणी यांच्या ३५० व्या जयंतीनिमित्त दरवर्षी भद्रकाली ताराराणी पुरस्कार देण्याची घोषणा केली. महापालिका निवडणुकीनंतर कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार असल्याचे नेत्यांनी सांगितले. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर व जोतिबा मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी १४०० कोटी रुपयेंची घोषणा सरकारने केली आहे. तसेच कोल्हापूरच्या विमानतळ विस्तारीकरण होणार आहे. कोल्हापूरला मेडिकल टुरिझम हब बनविण्यासाठी प्रयत्नशील आहे. असे नेत्याने सांगितले.
‘ज्यांच्याकडे सत्ता नाही ते कोल्हापूरचा विकास कसा साधणार ? विकासकामांसाठी निधी कुठून आणणार ? ’अशा शब्दांत महायुतीच्या नेत्यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले. ‘महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या हाती फार काही लागणार नाही. त्यांनी महायुतीला पाठिंबा द्यावा’अशी सूचना मंत्री मुश्रीफ यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केली. खासदार महाडिक यांनी आमदार पाटील यांना उद्देशून महापालिका निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित आहे. ते पाहून आमदार पाटील हे सैरभैर झाले आहेत. काहींही बोलत आहेत. काँग्रेसचा जाहीरनामा फसवा आहे. लोकसभा निवडणुकीप्रसंगी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनामाच काँग्रेसने महापालिका निवडणुकीत नव्याने प्रसिद्ध केला आहे’असा टोला लगावला. पालकमंत्री आबिटकर यांनी, कोल्हापूरच्या शाश्वत विकासासाठी महायुतीला विजयी करा. कोल्हापूरकरांना अभिमान वाटेल असा शहराचा विकास करू असे सागितले. आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर शहरातील विविध विकास योजना, रंकाळ तलाव सुशोभिकरण, आयटीपार्क जागा, महापुराचे पाणी दुष्काळीभागात वळविणे अशा विविध कामांचा ऊहापोह केला.