महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सहकार चळवळ रुजवली .त्यांच्या योगदानामुळेच तत्कालीन कालखंडात सुमारे 37 सहकारी संस्था उभ्या राहिल्या .कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची स्थापना १९३८ असून विद्यमान संचालकांच्या सचोटीमुळे सध्या ही बँक सुस्थितीत आहे .तथापि यात समाधान न मानता जागतिक स्पर्धेसाठी या बँकेसह राज्यातील इतर बँकांनी तयार राहावे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले .
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतन इमारत व इ - लॉबीचे उद्घाटन श्री पवार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पालकमंत्री हसन मुश्रीफ , खासदार धनंजय महाडिक , खासदार धैर्यशील माने, बँकेचे उपाध्यक्ष आमदार राजू आवळे,आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर ,आमदार राजेश पाटील माजी खासदार निवेदिता माने , माजी आमदार संजय घाडगे, माजी आमदार अमल महाडिक, भैय्या माने, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, आदी उपस्थित होते .
पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले,जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जिल्हयात १९१ शाखा आहेत.आत्तापर्यंत सुमारे २०४ कोटीचा ढोबळ नफा या बँकेला झाला आहे .जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करताना या बँकेने सढळ हाताने कर्जपुरवठा केला आहे .आतापर्यंत सातत्याने अ वर्ग मिळवला असून नोटबंदी कालावधीतील सुमारे 25 कोटी रक्कम पुन्हा मिळावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली . तर या बँकेत सुमारे ९५०० कोटी रुपयांच्या ठेवी असून सध्या बँक सुस्थितीत असल्याची माहिती बँकेचे उपाध्यक्ष तथा आमदार राजू आवळे यांनी दिली .
...............
पाच मजली इमारत...सु्ट्टीच्या दिवशीही बँक सुरू राहणार
सुमारे पंधरा कोटी रुपये खर्च करून नवीन पाच मजली इमारत बांधली असून धनादेशाच्या वठणावळीसाठी अगदी सुट्टीच्या दिवशीही बँक सुरू राहणार आहे. या नवीन इमारतीमध्ये अकाउंट , एटीएम ,क्लिअरिंग , गुंतवणूक , साखर कारखाना तसेच व्यक्तिगत कर्ज पुरवठा ,गुंतवणूक आदी विभाग या नवीन इमारतीमध्ये कार्यरत राहणार आहेत .इ - लॉबी सुविधेमुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेवा - सुविधा ग्राहकांना मिळणार आहेत .